टीम मंगळवेढा टाईम्स ।
करमाळा तालुक्यात धुमाकूळ घालणारा बिबट्याचा मुक्काम सध्या वांगी परिसरात आहे. या नरभक्षक बिबट्याला मारण्यासाठी वन विभागाच्या शार्प शूटरनी फायरिंग करूनही नेम चुकल्याने बिटरगाव येथून पुन्हा एकदा बिबट्या निसटला आहे.
यापूर्वी चिखलठाण परिसरातील उसात लपलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी पाच एकर ऊस पेटवून देण्यात आला होता. तसेच, चारही बाजूंनी शार्प शूटर तैनात करुनही बिबट्या वन अधिकाऱ्यांसमोरून पळाला होता.
आता नेम चुकल्याने तो पुन्हा निसटला आहे, त्यामुळे शार्पशूटर पाचारण करूनही बिबट्या एकदा नव्हे दोनदा नव्हे तर तीनदा सुटतोच कसा? असा प्रश्न संपूर्ण तालुक्याला पडला आहे.
नरभक्षक बिबट्यास गोळ्या घालण्याचे आदेश मिळूनही बिबट्याला शार्पशूटरचा नेम का लागत नाही?
याविषयी तालुक्यात उलट-सुलट चर्चा सुरू आहे. त्यामुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
यापूर्वी चिखलठाण येथे ७ डिसेंबर रोजी बिबट्याला मारण्यसाठी ऊस पेटवून देण्यात आला होता. त्या उसाच्या चारही बाजूंनी शार्पशूटर लावण्यात आले होते, तरीही वन अधिकाऱ्यांसमोरून बिबट्या पळाला होता.
त्यानंतर सांगवी नं. २ येथे गुरुवारी (ता. १० डिसेंबर) मनीषा पाटील या महिलेवर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यातून त्या कशाबशा बचावल्या. आतापर्यंत या नरभक्षक बिबट्याने नगर, बीड व सोलापूर जिल्ह्यातील १२ जणांचा बळी घेतला आहे. त्यात करमाळा तालुक्यात ६ दिवसांत ३ बळी घेतले आहेत.
करमाळा तालुक्यात वन विभागाचे २०० कर्मचारी तैनात असताना गेली १० दिवसांपासून वन विभागाला बिबट्या जेरबंद करता आला नाही. विशेष म्हणजे या नरभक्षक बिबट्यास गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
बिबट्याचा प्रवास सांगवी-नरसोबाचीवाडी ते वांगी नंबर-४, ढोकरी असा झाल्याचे सांगण्यात येत आहे. गुरुवारी मध्यरात्री दोन वाजता परप्रांतीय मच्छिमारांना बिबट्या दिसला होता. परंतु त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवला नाही.
शुक्रवारी (ता.11) पहाटे पाचपर्यंत वनविभागाची यंत्रणा वांगी नं.४ वरून बिबट्याचा माग काढत दुपारी चारपर्यंत बिटरगाव शिवारात पोचली.
बिटरगाव येथील विठ्ठल रोडगे यांच्या शेतात बिबट्या दबा धरून बसलेला असताना वन विभागाच्या शार्प शूटरने त्याच्यावर तीन वेळा फायरिंग केली.
परंतु नेम चुकल्याने त्याला चकवा देऊन निसटून जाण्यात बिबट्या पुन्हा यशस्वी झाला. बिबट्या बोरकर व नलवडे यांच्या शेतातून उसाच्या फडात गेला.
वनविभागाची यंत्रणा ड्रोन, वाघर, डाॅग पथक यांच्या मदतीने त्याचा शोध घेत आहे. बिबट्या निर्देशनास येऊनही त्याला मारले जात नाही की खरोखरच तो चकवा देत आहे, या विषयी नागरिकांच्या मनात संभ्रम आहे.
बिबट्याचा प्रवास हा नगर-बीड -करमाळातील उजनी धरणाच्या पाण्याच्या जवळपर्यंत झाला असून आता पुढे जाणे शक्य नसल्याने पुन्हा तालुक्यातील वांगीच्या दिशेने माघारी येण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे या परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
बिबट्याच्या शोधासाठीची यंत्रणा
प्रशासकीय पातळीवरून २१ पिंजरे, ३ ड्रोन कॅमेरे, ४२ ट्रप कॅमेरे, ५ शार्पशूटर, बेशुद्ध करणारी २ पथके, १ डाॅग स्वाॅड आणि वन विभागाची १६ पथके, राज्य राखीव दलाची एक तुकडी आणि ग्रामस्थ बिबट्याच्या शोधात आहेत.
बिटरगाव येथे वन विभागाने बिबट्यावर फायरिंग केली. मात्र, बिबट्या पुन्हा निसटला. खरंच वनविभागाला बिबट्याला मारायचा आहे का? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. समोर दिसूनही बिबट्याला गोळ्या का घातल्या जात नाहीत? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. अजून किती लोकांचे जीव जाण्याची हे वाट बघत आहेत.(सरकारनामा)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज