सध्या सोशल मीडियावर काही पोस्टचा प्रचंड धुमाकूळ सुरू आहे. सरपंचाची निवड पूर्वीप्रमाणे जनतेतून होणार असल्याचे या पोस्टमधून सांगण्यात येत आहे. त्यामुळे सरपंच होणार कसा? याच्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
इच्छुकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे सरपंच निवडीबाबत माहिती देताना म्हणाले, सरपंचांची निवड ही सदस्यांमधूनच होणार आहे.
सदस्यांमधून सरपंच निवडण्याचा निर्णय राज्यातील महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्यासाठी कायद्यातही बदल केला आहे. आता तोच निर्णय कायम आहे. येत्या काळात होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये सरपंचांची निवडही सदस्यांमधून केली जाणार आहे.
सोशल मीडियामध्ये व्हायरल होणाऱ्या काही पोस्ट मध्ये उच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिका व या याचिकामध्ये सरकारने माघार घेतल्याने जनतेतून सरपंच निवडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सरपंच निवडीबाबत कमालीचा संभ्रम पसरला आहे. हा संभ्रम आता पालकमंत्री भरणे यांच्या विधानामुळे दूर झाला आहे.
तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने जनतेतून सरपंच निवड करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्यांनी कायद्यातही बदला केला. सरपंच निवडीची ही पद्धत गावाच्या विकासाला मारक असल्याने राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने जनतेतून सरपंच निवडण्याची पद्धत बंद केली आहे.
निवडणूकीला सामोऱ्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीचा सरपंच आता सदस्यांमधून निवडण्यात येणार असल्याने आतापासूनच पॅनल निर्मितीच्या हालचालींना वेग आला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज