मंगळवेढा टाइम्स वृत्तसेवा । कोरोना महामारीच्या काळात पुढील तीन महिने सर्व केशरी कार्डधारक व गरजूंना रेशनच्या अन्नधान्याचा पुरवठा करण्यात यावा , अशी मागणी आ . प्रशांत परिचारक यांनी शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने रेशनकार्ड धारकांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत प्रति व्यक्ती पाच किलो पुढील तीन महिन्याचे मोफत धान्य देण्याचे जाहीर केले आहे.
त्या अनुषंगाने सार्वजनिक वितरण व्यवस्था व अन्न सुरक्षा या योजनामध्ये समाविष्ट असणाऱ्या कार्डधाकरांनाच रेशनचे धान्य मिळणार आहे . ज्यांचेकडे केशरी कार्ड आहे , अशांना त्यामधून वगळले आहे . पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातून जवळपास ७० हजार केशरी कार्डधारक लॉकडाऊन ‘ च्या काळात या योजनेपासून वंचित राहणार आहेत . सोलापूर जिल्ह्यातून जवळपास दोन ते अडीच लाख केशरी कार्डधारक या काळात वंचित राहणार आहेत.
या केशरी कार्ड धारकांमध्ये लहान उद्योग करणारे लोक आहेत . यामध्ये इस्त्री , सलून , चप्पल दुकानदार , हातगाडे , बाजारात कपडे विकणारे , टांगा – रिक्षा चालक , नदीवरील होडी चालक , हार – फुले , कुंक बुक्का विकणारे , खासगी नोकरदार , शेतकरी , मजूर अशा अनेक घटकांना संचारबंदीच्या काळात उद्योगधंदे बंद राहणार असल्यामुळे प्रचंड अडचणीला सामोरे जावे लागत आहे . हातावरचे पोट असणारे , रोज कमवन खाणारे लोकांचे उद्योग थांबल्यामुळे उत्पन्न बंद आहे.
अशा कुटुंबांना रेशनवर अन्नधान्य वाटप करणे गरजेचे असल्याचे आ . परिचारक यांनी नमुद केले आहे . याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी , अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील , माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर , राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे , उपमुख्यमंत्री अजित पवार , अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनजी भुजबळ , विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस , भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी आ . परिचारक यांनी संपर्क करून निवेदन पाठविले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज