टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा नगरपालिकेच्या हद्दवाढीच्या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगर विकास सचिवांना दिली. यामुळे मंगळवेढा शहरालगतच्या दोन मोठ्या ग्रामपंचायतींसह इतर लोकवस्ती नगरपालिकेत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यासंदर्भात राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष सोमनाथ माळी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्याबाबतचे निवेदन देत त्यांच्याशी चर्चा केली.
दिवंगत आमदार भारत भालके यांनी चोखामेळा नगर व दामाजी नगर या दोन स्वतंत्र ग्रामपंचायती अस्तित्वात आणल्या. परंतु या दोन ग्रामपंचायतींना पाणी व इतर काही सुविधांसाठी नगरपालिकेवर अवलंबून राहावे लागत आहे.
नगरपालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागात असलेल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून या दोन ग्रामपंचायतींची स्वच्छता व इतर गोष्टी करणे पालिकेला शक्य होते.
शिवाय या दोन ग्रामपंचायतींमधील बहुसंख्य मिळकतधारक आर्थिकदृष्ट्या संपन्न होते. परंतु, ते ग्रामपंचायतीकडे विलीन झाल्यामुळे त्यांच्यापासून मिळणारे नगरपालिकेचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते.सध्या या दोन ग्रामपंचायतींसह अकोला रस्त्यालगत असलेली जय भवानी कॉलनी, शरद कॉलनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलनी, एकवीरा माळ या भागात जवळपास 14 हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या आहे.
हा भाग नगरपालिकेत समाविष्ट झाल्यास नगरपालिकेला त्यांच्याकडून कर रूपाने उत्पन्न मिळणार असून, त्यांना नगरपालिकेच्या माध्यमातून आरोग्य, दिवाबत्ती व इतर सुविधा, विकासाच्या योजनांचा लाभ देणे देखील शक्य होणार आहे. त्या दृष्टीने नगरविकास सचिव यांना याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्काळ सूचना दिल्या आहेत.
याशिवाय शहरामध्ये भुयारी गटार योजना राबवण्यासाठी 42 कोटी 50 लाखांच्या प्रस्तावावर लवकरच सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितल्याची माहिती सोमनाथ माळी यांनी दिली.(सकाळ)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज