टीम मंगळवेढा टाईम्स।
विराट कोहलीची ‘विराट’ इनिंग आणि त्यानं हार्दिक पंड्यासोबत केलेली शतकी भागीदारी याच्या जोरावर भारतीय संघानं पाकिस्तानविरुद्धच्या महामुकाबल्यात 4 विकेट्सनी सनसनाटी विजय मिळवला.
अखेरच्या बॉलपर्यंत रंगलेल्या या सामन्यात अखेर टीम इंडियाची सरशी झाली. नाबाद 82 धावा करणारा विराट कोहली भारताच्या या विजयाचा खऱ्या अर्थानं नायक ठरला.
पाकिस्ताननं या सामन्यात भारतासमोर 160 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारतानं अखेरच्या ओव्हरच्या अखेरच्या बॉलवर विजयी लक्ष्य गाठलं आणि खऱ्या अर्थानं मेलबर्नमध्ये दिवाळी साजरी केली.
मेलबर्नमध्ये ‘विराट’ इनिंग 160 धावांचं लक्ष्य घेऊन उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवातीला 4 बाद 31 अशी केविलवाणी अवस्था झाली होती.
नसीम शाह आणि हॅरिस रौफनं भारताच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी धाडलं. रोहित आणि राहुल प्रत्येकी 4 धावांवर माघारी परतले. त्यानंतर सूर्यकुमार यादव (15) आणि अक्षर पटेल (2) फार काळ मैदानावर टिकू शकले नाहीत.
त्यानंतर विराट आणि हार्दिक पंड्यानं टीम इंडियाचा डाव सावरला. इतकच नव्हे तर दोघांनीही शतकी भागीदारीही साकारली.
विराट आणि हार्दिकनं केलेली 113 धावांची भागीदारी टीम इंडियाच्या विजयात मोलाची ठरली. विराटनं 53 बॉल्समध्ये नाबाद 82 धावा केल्या.
तर हार्दिकनं 40 धावांचं योगदान दिलं.
टीम इंडियाची दमदार गोलंदाजी त्याआधी भारतीय गोलंदाजांनी वर्ल्ड कप मोहिमेतल्या या सलामीच्या सामन्यात दमदार सुरुवात केली.
टीम इंडियाचा युवा गोलंदाज अर्शदीप सिंगनं आपला पहिलाच वर्ल्ड कप खेळताना कमाल केली. त्यानं आपल्या पहिल्याच ओव्हरच्या पहिल्या बॉलवर पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझमला शून्यावरच माघारी धाडलं आणि भारताच्या वाटेतला मोठा अडसर दूर केला.
त्यानंतर त्यानं भारताला आणखी एक यश मिळवून देताना रिझवानलाही 4 धावांवर बाद केलं. अर्शदीपनं आपल्या 4 ओव्हर्समध्ये 32 धावा देताना 3 विकेट्स घेतल्या.
याशिवाय हार्दिक पंड्यानं 3 तर शमी आणि भुवनेश्वरनं प्रत्येकी एक विकेट घेतली. पाकिस्तानकडून शान मसूद (ना. 52 ) तर इफ्तिकार अहमदनं (51) धावांची खेळी केली. त्यामुळे पाकिस्तानला 8 बाद 159 धावांची मजल मारता आली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज