टीम मंगळवेढा टाईम्स ।
सांगलीच्या लोकांना बदल हवा आहे. तेच मेरिट घेऊन शिवसेना मैदानात उतरली आहे. जागावाटपाचा निर्णय झाला असतानाही कुणी मैत्रीपूर्ण भाषा करीत असेल तर तो त्यांचा अपरिपक्वपणा म्हणावा लागेल.
सांगलीत शिवसेना लढण्यावर ठाम असून आला तर सोबत, अन्यथा तुमच्याशिवाय निवडणूक लढवून जिंकू, असा गर्भित इशाराच खासदार संजय राऊत यांनी सांगलीत येत काँग्रेसला दिला.
राज्यात महाविकास आघाडीला चांगले वातावरण असून, 35 पेक्षा अधिक जागा जिंकण्यात यश मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि शिवसेनेत वाद सुरू असतानाच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी खासदार राऊत हे शुक्रवारी सांगलीत दाखल झाले आहेत.
या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि दिल्लीत सांगलीची चर्चा होत आहे. सांगलीत काय होणार याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
मात्र, सांगली लोकसभा मतदारसंघातून चंद्रहार पाटीलच दिल्लीत जाणार, याबाबत कोणतीही शंका नाही. सांगलीतील जागेबाबत काँग्रेस नेत्यांची गेल्या काही दिवसांपासूनची भूमिका बघितली आहे. मात्र, ती राजकीय नेता म्हणून त्याचा आदर केला पाहिजे.
शिवसेनेच्या हक्काची कोल्हापूरची जागा काँग्रेसला दिली. रामटेकसाठी हट्ट होता तीदेखील जागा दिली. अमरावती लोकसभा ही काँग्रेसला सोडली, मग आम्ही सांगलीत एक उमेदवार जाहीर केला, तर तुमचा एवढा अट्टाहास कशासाठी, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
काँग्रेस नेते विश्वजित कदम आणि प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांची राजकारणात महत्त्वाची भूमिका आहे. हे आम्हाला मान्य आहे. परंतु सांगितलेल्या लोकांना बदल हवा आहे, तेच मेरिट घेऊन आम्ही चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली.
आता कुणी मैत्रीपूर्ण भाषा करीत असेल तर तो त्यांचा अपरिपक्वपणा आहे. सांगलीत शिवसेना लढण्यावर ठाम असून, आला तर सोबत, अन्यथा तुमच्याशिवाय निवडणूक लढवू, असा इशारा खासदार राऊत यांनी दिला.
विश्वजित विद्ववान नेते
लोकसभा निवडणुकीसाठी आग्रही असणाऱ्या शिवसेनेकडे जिल्ह्यात एकही ग्रामपंचायत, जिल्हा परिषद -पंचायत समिती सदस्य, नगरसेवक नाहीत तरीही सेना सांगलीसाठी हट्ट करत आहे. ते कसे जिंकणार, असा सवाल काँग्रेस नेते विश्वजित कदम करीत आहेत. त्याबाबत विचारले असता लोकसभा जिंकण्यासाठी असे पदाधिकारी असलेच पाहिजेत असे नाही.
आत्तापर्यंत काँग्रेसकडे हे सर्व लोक होते. मग त्यांचा उमेदवार का निवडून आला नाही. विश्वजित कदम विद्वान नेते आहेत. मागील निवडणुकीत सेनेचे किती व काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार याचाही कदम यांनी अभ्यास करावा, असा टोला लगावला.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज