टीम मंगळवेढा टाईम्स ।
देवाचे नवस फेडण्यासाठी ठेवलेले बोकड चोरट्यांनी चोरून नेले, मात्र रातोरात पाठलाग आणि चोरट्यांशी झटापट करून शेतकऱ्याने ते परत आणल्याचा प्रकार समोर आला आहे.
ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास पंढरपूर तालुक्यातील करोळे येथे घडली. याप्रकरणी करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
करोळे येथील शेतकरी बाजीराव मधुकर पाटील हे शेतीबरोबरच शेळीपालनाचा जोडव्यवसाय करतात. दि.२८ डिसेंबरच्या मध्यरात्री पाटील हे झोपले असता त्यांना रात्री १ वाजण्याच्या सुमारास चुलत भावाने गावात शेळीचोर आले असल्याचे फोनद्वारे कळविले.
त्यानुसार बाजीराव पाटील यांनी शेळ्या बांधलेल्या ठिकाणी जाऊन पाहिले असता देवाच्या नवसासाठीचे बोकड गायब झाल्याचे दिसून आले. या प्रकारानंतर पाटील यांनी इतर दोन सहकाऱ्यांना सोबत घेत मोटारसायकलवरून बोकड चोरांचा शोध घेण्यास सुरूवात केली.
याबाबत जागोजागी ते चौकशी करत होते.या दरम्यान , तीन अनोळखी लोक मोटारसायकलवर काळ्या रंगाचे बोकड घेऊन अकलूजच्या दिशेने गेले असल्याचे त्यांना सांगण्यात आले.
त्यानुसार वेगाने पाठलाग करत त्यांनी महाळुग (ता.माळशिरस) गावच्या हद्दीतील व्हरगर वस्तीजवळ बोकड चोरांना गाठले. यावेळी झालेल्या झटापटीत चोरटे बोकड व त्यांची मोटारसायकल जागीच टाकून पळून गेले. याप्रकरणी तीन अज्ञात चोरांविरोधात करकंब पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज