टीम मंगळवेढा टाईम्स।
पावसाळा संपल्यानंतर नोव्हेंबर, डिसेंबर आणि आता जानेवारीतही अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत आहे. काल व आज दिवसभर जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे.
तसेच अनेक ठिकाणी तुरळक प्रमाणात अवकाळी पावसाने हजेरी लावली. ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष, बोर बागायतदारांची चिंता वाढली असून भाजीपाला, हरभरा, कांदा ही पिके धोक्यात आल्याची स्थिती आहे.
हिवाळ्याची थंडी ढगाळ वातावरणामुळे कमी झाली असून त्याचा फटका कांद्याला मोठ्या प्रमाणात बसणार आहे. उत्तर सोलापूर, मोहोळ, करमाळा, बार्शीसह इतर काही तालुक्यांमधील ठराविक भागात तुरळक पाऊस झाला आहे.
दरम्यान, पुढील दोन तीन दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरण असू शकते, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. थंडीच्या दिवसात ढगाळ वातावरण किंवा अवकाळीच्या रिपरिपमुळे रोगराईचा प्रार्दुभाव वाढतो.
बहरात आलेली ज्वारी, गहू, मका अशा पिकांना ढगाळ वातावरण फायद्याचे आहे, पण इतर बहुतेक पिकांसाठी ते धोकादायकच मानले जाते, अशा वातावरणामुळे माणसांनाही त्रास होतो, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.
यंदा पावसाळ्यात पाऊस कमी झाल्याने रब्बी पिके वाया गेली, खरिपात समाधानकारक पाऊस नाही आणि आता सातत्याने वातावरणात बदल होत असल्याने आधीचाच अडचणीतील बळिराजा पुन्हा जास्तच अडचणीत सापडल्याची वस्तुस्थिती आहे.
रोग व किडीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी पीकनिहाय फवारण्या करून घ्याव्यात. हवामानातील बदलाचा विचार करून शेतकऱ्यांनी वेळोवेळी औषध फवारणी करावी आणि फळबागांची जपणूक करावी, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने यांनी केले आहे. जेणेकरून हवामानाच्या बदलाचा फटका पिकांना बसणार नाही.
ढगाळ वातावरणाचा ‘या’ पिकांना धोका
ढगाळ वातावरणामुळे वाढू शकते द्राक्ष, डाळिंब, बोर या फळबागांवर रोगराई, पोटऱ्यातील ज्वारी, गहू, मक्याला लाभदायक, पण हरभऱ्यावर पडते अळी, भाजीपाल्यासह इतर पिकांवरही ढगाळ वातावरणामुळे अनेक रोग पडू शकतात
ढगाळ वातावरण किंवा हलक्या पावसामुळे वाळत ठेवलेला किंवा काढणीला आलेला कांदा खराब होतो.(स्रोत:सकाळ)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज