टीम मंगळवेढा टाईम्स ।
शेतकऱ्यांचा राजवाडा असलेल्या श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवड येत्या गुरुवारी दि.२१ जुलै होणार आहे.
चेअरमनपदी उद्योजक अभिजीत पाटील यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे तर व्हाईस चेअरमनपदी कोणाला संधी दिली जाते ? याची संपूर्ण तालुक्याला उत्सुकता लागली आहे.
शेतकऱ्यांचा राजवाडा आणि तालुक्याच्या अर्थकारणाचा कणा अशी ख्याती असलेल्या या कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच झाली. यामध्ये अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने २१ पैकी २० जागा जिंकून दणदणीत विजय मिळविला.
सत्ताधारी भालके-काळे तसेच युवराज पाटील गटाला बाजुला सारत सभासदांनी अभिजीत पाटील यांच्या रूपाने साखर कारखानदारीत कर्तृत्व अन् नेतृत्व सिद्ध केलेल्या नव्या दमाच्या तरुणाकडे सत्ता सोपवली.
यानिमित्ताने भालके गटाची तब्बल १८ वर्षांची सत्ता संपुष्टात आली. मात्र, स्व
भारत भालके यांच्याच विचारांचा वारसा घेत एकेक दमदार पाऊल टाकत असलेल्या अभिजीत पाटील या नव्या पर्वाची सुरूवात झाली आहे.
येत्या गुरुवारी दुपारी कारखाना कार्यस्थळावर चेअरमन व व्हा.चेअरमन निवडीची प्रक्रिया पार पडणार आहे. चेअरमनपदी विराजमान होत असलेल्या अभिजीत पाटील यांच्या ताब्यात आता १ सहकारी आणि ५ खासगी असे तब्बल अर्धा डझन साखर कारखाने असणार आहेत.
याचवेळी या कारखान्याच्या व्हा. चेअरमन पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार ? याचीही उत्सुकता संपूर्ण तालुक्याला आहे.
स्वतः अभिजीत पाटील, प्रा.डॉ.बी.पी. रोंगे यांच्यासह सर्व शेतकरी संघटनांच्या नेतेमंडळींच्या समन्वयातून व्हा.चेअरमन पदाचा उमेदवार ठरविला जाणार आहे.(स्रोत:पुण्यनगरी)
सहा कारखाने अन् सहावे चेअरमन
अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत, श्री विठ्ठलाच्या नावाने असलेल्या या कारखान्याचे संस्थापक, पहिले चेअरमन कर्मवीर कै.औदुंबर अण्णा पाटील यांच्या कारकिर्दीचे, उत्कृष्ठ कारभाराचे आजही राज्यभर दाखले दिले जातात.
त्यांच्यानंतर कै.राजाभाऊ पाटील, कै .वसंतदादा काळे, कै . भारत भालके आणि भगीरथ भालके या पाच जणांनी चेअरमनपद भूषविले.
प्रत्येक टप्प्यावर या कारखान्याच्या नेतृत्वाने समाजकारण, राजकारणात नावलौकिक मिळविला. त्यांच्यानंतर आता सहावे चेअरमन होण्याचा बहुमान अभिजीत पाटील यांना मिळत आहे. याचवेळी त्यांच्या ताब्यात हा सहावा कारखाना आल्याचा योगायोगही जुळून आला आहे.
निवडीनंतर होणार मिल रोलर पूजन
आर्थिक अडचणींच्या गर्तेत सापडल्याने दोन हंगाम बंद राहिलेला हा कारखाना यंदा कोणत्याही परिस्थितीत सुरू करण्याचा शब्द अभिजीत पाटील यांनी सभासदांना दिला होता.
निकालाच्या दुसऱ्याच दिवसापासून त्यादृष्टीने त्यांनी पाऊले टाकत कारखाना सुरू करण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे.
याचाच एक भाग म्हणून चेअरमन निवडीनंतर लगेच मिल रोलरचे पूजन करून पुढचा टप्पा पूर्ण करणार असल्याचे अभिजीत पाटील यांनी सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज