टीम मंगळवेढा टाईम्स ।
भारत देशाची दक्षिण काशी म्हणून परिचित असलेल्या पंढरपूर शहरात व शहराजवळील नऊ गावे येथे यावर्षीच्या आषाढी एकादशी कालावधीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेली नऊ दिवसांची संचारबंदी कमी करून ती 3 दिवसांची करावी अशी मागणी करणारे पत्र आमदार समाधान आवताडे व आमदार प्रशांत परिचारक यांनी संयुक्तरित्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांना दिले आहे.
दोन्ही लोकप्रतिनिधी यांनी पत्रात म्हटले आहे की, गतवर्षी कोरोना कालावधीत राज्य सरकारने ३ दिवसांची संचारबंदी केली होती. अगदी त्याच धर्तीवर यावर्षीच्या संचारबंदी चा विचार करून ती संचारबंदी कमी करावी असे पत्रात नमूद केले आहे.
तसेच पंढरपूर नगरीतील आषाढी एकादशी ही वर्षातील सर्वात मोठी वारी असते. परंतु विश्वव्यापी कोरोनाच्या प्रादुर्भाव अनुषंगाने गेल्या दोन वर्षांपासून सदर महामारीस अटकाव होण्याच्या दृष्टीने सर्व वारी सोहळे रद्द करण्यात आले आहेत.
पंढरपूरचा वारी सोहळा हा शहरातील स्थानिक लहानमोठा व्यापारी वर्ग, कष्टकरी मजूर हारफुले विक्रेते, प्रासादिक भांडार, रिक्षा – टांगेवाले आदी छोटे – मोठे व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी उदरनिर्वाह करून आपली गुजरण करण्याचे आश्वासक आणि खात्रीशीर साधन असल्यामुळे त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न लक्षात घेऊन प्रशासनाने ही संचारबंदी कमी करावी अशी मागणी या पत्रात केली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या सावटाखाली प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याकरिता सर्वच उद्योगधंदे व व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे अनेकांचे अर्थचक्र विस्कळीत झाले आहे.
परंतु आता अर्थिक परिस्थिती पूर्णपणे कोलमडली असल्याने पुनःश्च आपल्या व्यवसायाचा श्रीगणेशा करून अर्थिक घडी पूर्वपदावर आणण्यासाठी ही संचारबंदी १९ जुलै ते २१ जुलै या ३ दिवस कालावधीसाठी ठेवून उर्वरित दिवस संचारबंदी शिथिल करावी जेणेकरून
कोविड – १९ मुळे अडचणीत आलेले व्यावसायिक व शेतकरी बांधवांचे होणारे नुकसान व अडचण कमी होईल अशी मागणी या पत्रात आ.समाधान आवताडे व आ. प्रशांत परिचारक यांनी केली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज