मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
पंढरपूर व मंगळवेढा हे तालुके सध्या दुष्काळाने होरपळत आहेत. इतर ठिकाणी पाऊस झाला,परंतु मंगळवेढा पंढरपुर तालुक्याला अद्याप पर्यंत पाऊस झालेला नाही. तरी उजनी कॅनालद्वारे माण नदीमध्ये पाणी सोडण्यात यावे अशी मागणी संत दामाजी कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांनी जलसंधारण मंत्री विजय शिवतारे यांच्याकडे केली आहे.
माण नदी कोरडी आहे.माण नदीकाठच्या गावातील पिके सध्या होरपळून जात आहेत. त्यामुळे माण नदी लाभक्षेत्र भागातील पशुधन धोक्यात आले आहे.तसेच या भागात पशुधन वाचविण्यासाठी चारा छावण्या नाहीत. या परिस्थितीत येथील शेतकरी हवालदिल झाला आहे.
उजनी धरण क्षेत्रात पाऊस चांगला झाल्याने उजनी धरण भरून चंद्रभागा नदीहि दुथडी भरून वाहत आहे. शेतकऱ्यांची अडचण जाणून घेऊन उजनी कॅनलद्वारे (URBC) अतिरिक्त पाणी गुंजेगाव येथून माणनदीला सोडल्यास गुंजेगाव, शेटफळ, महमदाबाद, तनाळी मारापुर,तावशी,सिद्धेवाडी,घरनिकी, मल्लेवाडी, ढवळस, धर्मांवर, मुढवी, ओझेवाडी या 14 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा व पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
सदरचे पाणी सोडल्यास पिण्याचे पाण्याची सोय होऊन पशुधन वाचण्यास मदत होणार आहे. तरी यासाठी उजनी कॅनाॅल व्दारे नदीला पाणी लवकरात लवकर सोडण्यात यावे अशी मागणी त्यांनी यापुढे केली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज