मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
घरातून पळून जावून लग्न केलेल्या मुलीवर वडिलांनी अनोख्या पद्धतीने राग व्यक्त केला आहे. मुलगी पळून गेली म्हणून वडिलांनी चक्क तिला श्रद्धांजलीच वाहिली आहे. तेही गावात मोठा बोर्ड लावून त्यावर तिचा फोटोसुद्धा लावला आहे. या बोर्डाचे फोटो सध्या सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मुलीच्या जिवंतपणीच स्वत:च्या मुलीला स्वर्गवासी केल्यामुळे वडिलांविरोधात संताप व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावातील मुलगी प्रियकरासोबत पळून गेली.
वडिलांना याबाबत समजताच त्यांनी संताप व्यक्त केला. गावातच तिच्या श्रद्धांजलीचे बोर्ड लावून तिला स्वर्गवासी केले आहे. तिच्या फोटोत तिच्या नावाखाली कै. आणि विश्वासघातकी असे लिहण्यात आले आहे.
शिवाय शोकाकूल – आत्मक्लेश असे लिहून `बाळ तू जन्माला येतानाच आईला संधीवाताचा आजार तुझ्या आईला घेऊन आलीस.. त्या वेदना सहन करीत ज्या आईने तुझे सर्व हट्ट, लाड, पुरवित मोठे केले ती दुर्दैवी आई. तुला तळहाताच्या फोडाप्रमाणे तिने जपलं. पण यापुढील तुझ्या आयुष्यात आनंद सुख देण्यास असमर्थ ठरला म्हणून तू सोडून गेलीस हा काळा दिवस पाहण्यासाठी जिवंत असलेला असा कमनशिबी बाप.` असा संदेश लिहला आहे.
शिवाय या बॅनरवर लाल अक्षरात बोध असे लिहून त्यासमोर `हे वाचून अशा वागणाऱ्या मुलींच्या मनाचे परिवर्तन होऊन आपल्या आई वडिलांचा विश्वासघात करणार नाहीत ही अपेक्षा.. असंही यामध्ये म्हटलं आहे. मुलीच्या फोटोवर काळ्या रंगात काटही मारण्यात आली आहे.
दरम्यान, या बोर्डचे फोटो व्हायरल झाल्यानंतर तो उतरविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
—————
मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज