मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कर्जमाफीची यादी प्रसिद्ध होण्याच्या दिवशीच, सततची नापिकी, मागील वर्षीच्या अतिपावसाने झालेल्या नुकसानीने कर्जबाजारी झालेल्या वरठाण (ता. सोयगाव) येथील गणेश रामसिंग जाधव (वय. ३५) या तरूण शेतकऱ्याने आत्महत्या केली. ही घटना आज (शनिवार) सकाळी दहाच्या सुमारास घडली.
या विषयी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, वरठाण शिवारामध्ये गट नं. १८० मध्ये इंदुबाई रामसिंग जाधव यांच्या नावे तीन एकर जमीन आहे. त्यांना रावसाहेब व गणेश ही दोन मुले आहेत. हे दोघेही जमिनीस वारस असून, त्यांचे एकत्रीत कुटुंब आहे. त्यांच्या कुटुबांची परिस्थिती अंत्यत नाजूक असून, शेती व मोलमजुरी करुन ते आपल्या कुटुबांचा उदरनिर्वाह करतात.
घरातील मंडळी मजुरीच्या कामाला गेले असता, राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन त्याने जीवनयात्रा संपविली. मोठा मुलगा हर्षल हा गावातील मराठी शाळेत शिकतो. तो शाळेला गेला होता. परंतू दप्तर घरीच विसरून गेल्याने त्यांचा मुलगा दप्तर घेण्याकरिता पुन्हा घरी आला. यावेळी घराचा दरवाजा उघडताच, वडील दोरीला लटकलेले दिसताच चिमुकल्याने मोठ्याने हबंरडा फोडला. यावेळी गावातील तरूणांनी घरात धाव घेत, दोरीवर लटकलेल्या अवस्थेतील गणेशला काढून पाचोरा येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषीत केले. गणेशची उत्तरीय तपासणी पाचोरा येथील सामान्य रुग्णलयात करण्यात आली. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. घरातील कमावता व्यक्ती गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज