मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । 31 मार्च पर्यंत सोलापूर शहर व जिल्ह्यातील यात्रा, मेळावे व अन्य सामुदायिक होणारे कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घेतला असून यांचा आदेश त्यांनी पारित केला आहे.
आंतरराष्ट्रीयस्तरावर व देशांतर्गत कोरोना या विषाणूचे संसर्ग बाधीत रुग्ण आढळत आहेत . तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरुन व देशांतर्गत विमान प्रवासाद्वारे प्रवासी भारतात सर्वत्र प्रवास करीत आहेत , असे प्रवासी सोलापूर जिल्ह्यामध्येही परदेश प्रवास करुन आलेले आहेत व बरेच प्रवासी परतण्याच्या मार्गावर आहेत.त्यामुळे कोरोना या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व कोरोना विषाणूचे संसर्ग असल्यास त्यात अधिक वाढ होऊ न देता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे.अशा प्रवाशांमुळे कोरोना विषाणूचा संसर्ग जिल्ह्यात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यास्तव गर्दीच्या ठिकाणी जाणे , वास्तव्य करणे इत्यादी बाबी टाळणे अत्यावश्यक आहे . उपरोक्त प्रमाणे कोरोना विषाणूच्या प्रसाराचे माध्यम पाहता , सदर विषाणूची लागण एका संक्रमीत रुग्णाकडून अन्य व्यक्तीस / इसमास त्याच्या संपर्कात आलेने होण्याची शक्यता विचारात घेता , मिलींद शंभरकर , अध्यक्ष , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हादंडाधिकारी सोलापूर , जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम , २००५ कलम ३४ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ४३ अन्वये , मला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन या आदेशाद्वारे मोठया प्रमाणात लोकांचा समुह एकत्र जमू न देण्यासाठी , संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये घेणेत येणाऱ्या सभा , मेळावे , सामाजिक कार्यक्रम , जत्रा , यात्रा , उरुस , धार्मिक व सांस्कृतीक कार्यक्रम , क्रिडा स्पर्धा , इत्यादीवर आज दिनांक १४ मार्च , २०२० ते दिनांक ३१ मार्च , २०२० पर्यंत बंदी लागू करीत आहे .
जत्रा , यात्रा , उरुस इ . धार्मिक सामाजिक कार्यक्रमात पुजारी किंवा धर्मगुरु इ . ना विधिवत पुजा करण्यास किंवा परंपरेने करावयाचे कार्यक्रम मोजक्या लोकांचे उपस्थितीत करण्यास बंदी असणार नाही , तसेच खाजगी कार्यक्रम फक्त कौटुंबिक स्वरुपात करण्यास बंदी असणार नाही . परंतु या दोन्ही बाबतीत सर्व वैद्यकीय सुरक्षा पाळणे बंधनकारक राहील .
यासाठी संबंधित तालुक्याचे तहसिलदार किंवा मुख्याधिकारी , नगरपालिका किंवा आयुक्त , सोलापूर महानगरपालिका यांची त्यांचे कार्यक्षेत्रातील अशा कार्यक्रमासाठी लेखी पुर्व परवानगी घ्यावी लागेल , सर्व शासकीय यंत्रणांना ही निर्देशीत करीत आहे की , अशाप्रकारे सभा , मेळावे , सामाजिक कार्यक्रम , जत्रा , यात्रा , उरुस , धार्मिक व सांस्कृतीक कार्यक्रम , क्रिडास्पर्धा , इत्यादीच्या आयोजना संदर्भात कोणतीही परवानगी त्यांच्या स्तरावर देण्यात येऊ नये . त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी व मुख्याधिकारी नगरपालिका / परिषद व आयुक्त , सोलापूर महानगरपालिका यांना त्यांचे त्यांचे कार्यक्षेत्रात होणाऱ्या अशा कार्यक्रमांना प्रतिबंध करण्यासाटी तसेच फक्त विधिवत पुजा किंवा कौटुंबिक कार्यक्रमांना परवानगी देण्यासाठी प्राधिकृत करुन तसे अधिकार प्रदान करण्यात येत आहेत . या आदेशाचे किंवा संबंधित तहसिलदार किंवा मुख्याधिकारी किंवा आयुक्त यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करुन अशा गर्दीचे कार्यक्रम आयोजित केल्यास संबंधित संयोजकाविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ कलम ५१ अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ४३ अन्वये कारवाई करण्यात येईल , यासाटी संबंधित सर्व तहसिलदार , मुख्याधिकारी व आयुक्त यांना प्राधिकृत करण्यात आला आहे.
जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in
This News First Publish on mangalwedhatimes.in®
जाहिरात
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज