मंगळवेढा टाइम्स न्युज नेटवर्क ।
उजनी धरणाच्या इतिहासात पहिल्यांदाच धरण जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्चात ६० टक्क्यांपेक्षा जास्त भरले आहे. धरणात ९५ पीएमसी पाणीसाठा आहे. त्यामुळे जुलै महिन्यामध्ये भीमा नदीला महापुराची भीती व्यक्त होत आहे.
तसेच आषाढी यात्रेवरदेखील महापुराचे सावट आहे. महापूर आल्यास शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्यामुळे आता कॅनॉलद्वारे उजनी धरणातून पाणी सोडण्याची मागणी होत आहे.
यंदा मे महिन्यातच मान्सूनपूर्व पावसाने सोलापूर जिल्ह्याला झोडपून काढले. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातदेखील मुसळधार पाऊस झाल्याने जून महिन्याच्या पंधरा तारखेलाच उजनी धरण ५० टक्के भरले होते.
आता पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. धरणामध्ये १८ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत आहे, तर नीरा नदीमधून देखील मोठ्याप्रमाणात पाणी भीमा नदीत येत आहे. त्यामुळे जुलै महिन्यात भीमा नदीला महापूर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भीमा नदीला महापूर आल्यास नदीकाठच्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तसेच नदीकाठच्या गावांना आणि शहरांना महापुराचा मोठा फटका बसतो. महापुराचा संभाव्य धोका टाळण्यासाठी त्यामुळे उजनी धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्यातून तसेच भीमा नदीद्वारे पाणी सोडण्याची मागणी आता शेतकऱ्यांमधून होत आहे.
उपाय शोधणे गरजेचे
उजनी धरणातून पाणी सोडण्याची शेतकरी आणि नदीकाठच्या गार्यातून मागणी होत आहे. सध्या धरण ६० टक्के भरले आहे. ते ७४ टक्के भरल्याशिवाय पाणी सोडण्याचा निर्णय घेता येत नाही.
उजनी धरणाच्या व्यवस्थापन समितीची चर्चा करून संभाव्य महापूर कसा रोखता येईल, याबाबत उपाययोजना करणे गरजेचे आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दोन दिवसांपूर्वी प्रशासनाची बैठक घेऊन पूरस्थितीवर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या.
पाणीपुरवठा करणारे सर्व बंधारे भरून घेण्यात यावे
उजनी धरणाच्या पाण्याचे नियोजन कागदावर वेगळे आणि प्रत्यक्षात वेगळे असाच अनुभव सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आहे. यंदा आषाढी यात्रेकडे मुख्यमंत्र्यांपासून सर्वांचे लक्ष आहे. यात्रेत महापुराचा धोका टाळण्यासाठी उजनीतून ताबडतोब पाण्याचा विसर्ग सोडण्यात यावा. सोलापूर पाणीपुरवठा करणारे सर्व बंधारे भरून घेण्यात यावे. जेणेकरून अतिरिक्त पाऊस झाल्यास धरण भरण्यास मदत होईल व अन् वारीला पाणी सोडल्याने पूरस्थिती निर्माण होणार नाही. – राजू खरे, आमदार
आषाढी यात्रेच्या काळात महापूर आल्यास याचा फटका
भीमा नदीला पूर आल्यानंतर फक्त शेतीचेच नुकसान होत नाही; तर पंढरपूर शहराच्या सखल भागामध्ये पाणी घुसल्याने पंढरपूरच्या नागरिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अशामध्येच आषाढी यात्रेच्या काळात महापूर आल्यास याचा फटका वारकऱ्यांबरोबर स्थानिक रहिवासी आणि व्यापाऱ्यांनाही होतो. त्यामुळे आता उजनी धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करून पाणी सोडण्याची मागणी पंढरपुरातील नागरिकही करत आहेत. सचिन पाटील, शेतकरी
योग्य निर्णय घेण्याची गरज
पंढरपूरला महापुराचा धोका फक्त उजनी धरणातून येणाऱ्या पाण्यापासूनच नाही; तर नीरा नदीचे पाणी थेट भीमा नदीत येते. त्यामुळे दोन्ही बाजूंनी धोका असल्याने पाणी सोडण्याबाबत तत्काळ आणि योग्य निर्णय घेण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे उजनी धरणातून पाणी न सोडल्यास महापुराचा धोका होऊ शकतो, याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. शाम गोगाव, अभ्यासू नागरिक, पंढरपूर
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज