टीम मंगळवेढा टाईम्स ।
कोरोनाविरुद्धच्या लढ्यात पहिल्या लाटेपासूनच फ्रंटलाइनमधील कर्मचाऱ्यांसह ग्रामीण भागातील छोट्या-मोठ्या गावांना कोरोनापासून लांब ठेवण्याचे कार्य पोलिस पाटलांमार्फत होत आहे.
यात अनेक पोलिस पाटलांचा कोरोनाची लागण होऊन मृत्यूही झाला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत मंगळवेढा तालुक्यातील जालिहाळ गावाला कोरोनापासून मुक्त ठेवलेले पोलिस पाटील हणमंत कांबळे दुसऱ्या लाटेत मात्र कोरोनाशी लढताना हरले.
14 दिवसांपूर्वीच त्यांच्या आईचे देखील कोरोनाने निधन झाले. रविवारी पहाटे पोलिस पाटील हणमंत पाटील यांचा कोरोनाने बळी घेतला.
कोरोनाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात वाढल्यामुळे गावपातळीवर ग्रामस्तरीय समितीमधील तलाठी, ग्रामसेवक यांच्यावर अतिरिक्त गावांचा पदभार आल्यामुळे गावगाड्यातील सर्वस्वी जबाबदारी पोलिस पाटलांवर आली.
मंगळवेढा येथून पंधरा किलोमीटर अंतरावर जवळपास दोन हजार लोकवस्तीच्या जालिहाळमध्ये अशिक्षित लोकांची संख्या जास्त असल्यामुळे कोरोनाच्या पहिल्या लाटेत लोकांना घराबाहेर फिरू नका, मास्क वापरा, गर्दी करू नका, असे सांगताना लोकांना विश्वास बसायचा नाही.
पोलिस पाटील काहीतरी सांगतोय, असा समज गावकऱ्यांना व्हायचा. अशा परिस्थितीत गावकऱ्यांसाठी प्रसंगी पोलिसांना पाचारण करून गाव कोरोनापासून मुक्त ठेवण्याचा प्रयत्न पोलिस पाटील हणमंत पाटील यांनी केला.
मात्र, मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या दुसऱ्या लाटेतच पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणूक झाली. याची नजर गावाला लागली. या दरम्यान गावामध्ये 30 च्या आसपास पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता.
यात 9 जणांचा मुत्यू झाला. याच लाटेत पोलिस पाटील हणमंत कांबळे यांची आई मालन कांबळे यांचा गेल्या चौदा दिवसांपूर्वी मंगळवेढा येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
कुटुंबामध्ये स्वतः पोलिस पाटील व त्यांचा लहान मुलगा रॅपिड अँटिजेन चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आढळले. त्यांची अंगणवाडी सेविका असून, त्या कोरोना निगेटिव्ह आल्या. पोलिस पाटलाने उपचारासाठी सांगली जिल्ह्यात आश्रय घेतला.
मात्र, उपचार सुरू असताना रविवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. पत्नी अंगणवाडी सेविका व लहान मुलगा हे दोघे आता पोरके झाले आहेत. त्यामुळे गाव कोरोनापासून मुक्त ठेवण्यासाठी पहिल्या लाटेत जीव धोक्यात घालून धडपडणाऱ्या पोलिस पाटलाचा दुसऱ्या लाटेत मात्र स्वतःचा जीव गमवावा लागल्याने गाव हळहळले.(स्रोत:सकाळ)
तोकड्या मानधनाच्या जीवावर गावाला कोरोनामुक्त ठेवले
कोरोनाच्या लाटेत आपल्या व आपल्या कुटुंबाचा जीव सुरक्षित राहावा म्हणून अनेक शासकीय कर्मचारी काम आहेत. मात्र तोकड्या मानधनाच्या जीवावर गावाला कोरोनामुक्त ठेवण्यासाठी जीव धोक्यात घालणारे पोलीस पाटील व ग्रामरक्षक दलासह सध्या गावातील मोजके तरुण पुढाकार घेत आहेत.
ग्रामीण भागातील अत्यावश्यक सेवेतील दूध, किराणा, पिठाची गिरणी व्यावसायिकांना लसीकरणामध्ये प्राधान्य द्यावे. शासनाने कोरोना काळात मृत्यू झालेल्या पोलिस पाटलांच्या वारसांना 50 लाखांचा मदतनिधी द्यावा. – सचिन चौगुले, सरपंच, जालिहाळ, सिद्धनकेरी
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज