मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
कधी दुष्काळ तर कधी शेतमालाचे पडलेले भाव यामुळे खचलेल्या बळीराजाला सरकारकडून मदतीचा हात अपेक्षित असतो. 2016-17 मध्ये कांद्याचे दर घसरल्यामुळे सरकारने कांद्यासाठी 100 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे अनुदान देण्याचे जाहीर केले. चार वर्षांपूर्वी जाहीर केलेल्या अनुदानाची रक्कम सरकारने आता शेतकऱ्यांसाठी दिली आहे.
राज्यातील पाच हजार 282 शेतकऱ्यांसाठी सरकारने चार कोटी 25 लाख रुपयांचे अनुदान देण्यास मान्यता दिली आहे.
2016-17 या वर्षातील मदतीसाठी नाशिक, सोलापूर, औरंगाबाद, परभणी या जिल्ह्यातील दोन हजार 750 शेतकरी पात्र ठरले आहेत.
या शेतकऱ्यांना एक कोटी 72 लाख 24 हजार 994 रुपये मिळणार आहेत. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील 1602, सोलापूर जिल्ह्यातील 445, औरंगाबादमधील 14 तर परभणी जिल्ह्यातील 689 शेतकरी या मदतीसाठी पात्र ठरले आहेत. 2016- 17 मध्ये कांद्याचे दर पडल्यानंतर या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने प्रति क्विंटल शंभर रुपये प्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. 2018-19 मध्येही कांद्याचे दर पडल्यानंतर या कालावधीतील शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी सरकारने प्रति क्विंटल दोनशे रुपये या प्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता.
दोनशे रुपयांच्या अनुदानासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा कृषी उत्पन्न बाजार समिती व नाशिक जिल्ह्यातील नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील 2 हजार 532 शेतकरी पात्र ठरले आहेत. परांडा येथील 2198 व नांदगाव येथील 334 शेतकऱ्यांना दोन कोटी 30 लाख 29 हजार 366 रुपये मंजूर झाले आहेत. अनुदानासाठी प्रस्ताव पाठविल्यानंतर मदतीची वाट पाहून थकलेल्या शेतकऱ्यांना तब्बल चार वर्षानंतर अनुदानाची रक्कम मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज