मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात बाहेर जिल्हयातून दि.1 एप्रिल अखेर जवळपास 9
हजार 864 नागरिक आले असल्याची नोंद आरोग्य विभाग तसेच नगरपालिका व ग्रामीण रुग्यालय यांच्याकडे झाली आहे. दरम्यान,बाहेरून आलेल्या नागरिकांची ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे.
कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर मंगळवेढा तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावनिहाय घरोघरी जावून आरोग्य सेविका,आरोग्य सेवक,अंगणवाडी सेविका व मदतनीस,आशा आदींनी सर्व्हे केल्यानंतर बाहेरच्या जिल्हयातून एक एप्रिलअखेर 9412 नागरिक मंगळवेढाच्या ग्रामीण भागात आले आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- आंधळगांव -1,981,सलगर बु-1,356,भोसे-2,427,बोराळे-1,517,मरवडे -2,131 असे एकूण 9412 नागरिक नव्याने सांगली,पुणे,कोल्हापूर,सातारा,मुंबई आदी भागातून दाखल झाले आहेत. ग्रामीण रुग्णालयाकडे दि.31 मार्च रोजी 13 नागरिक बाहेरून आल्याची नोंद झाली आहे.यामधील 7 नागरिक लोक कर्नाटक राज्यातील चिंचणी येथून आल्याचे सांगण्यात आले.
मंगळवेढा शहरात 8 लोकांच्या टिमने शहरात सर्व्हे केला असताना जवळपास बाहेरून 439 नागरिक आल्याची नोंद नगरपालिकेकडे झाली आहे. दरम्यान सध्या कोरोना या संसर्गजन्य आजाराने सर्वत्र थैमान घातले असताना मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात व इतर प्राथमिक आरोग्य केंद्रात मास्क,सॅनिटायझर, किट,हँड ग्लोज व इतर साधने उपलब्ध नसल्याने वैद्यकीय अधिकार्यांना आपला जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करावी लागत असल्याने तेथील डॉक्टरांचा जीव टांगणीला लागला आहे. शासनाने सद्याची असलेली गंभीर परिस्थिती लक्षात घेवून विविध साधनांचा पुरवठा करावा अशी मागणी होत आहे.दरम्यान यापुर्वी परदेशातून 8 जण आले असून त्यांना होम क्वारंटाईन्डमध्ये ठेवण्यात आले आहे.या आठजणांवर आरोग्य विभागाची करडी नजर आहे.
मंगळवेढयात कोरोना या संसर्गआजाराला टक्कर देण्यासाठी शासनाचे पाच अॅब्यूलन्स उपलब्ध आहेत. अॅब्युलन्समधील डॉक्टर व चालक यांना किट संरक्षक व मास्क नसल्यामुळे यांना जीव धोक्यात घालून रुग्णांना सोलापूर अथवा अन्य ठिकाणी न्यावे लागत आहे.पाच अॅम्ब्युलन्स उपस्थित असताना केवळ एम एच 14 सी एल 0742 या अॅब्युलन्सला वारंवार कॉल देवून पाठविले जात असल्याचा आरोप डॉ.दत्तात्रय हजारे यांनी केला आहे.
सध्या उष्णता वाढत असल्याने ताप,सर्दी,खोकला किरकोळ स्वरूपात वाढण्याची शक्यता आहे. याला अटकाव करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी लिंबू सरबत,थंड पाण्याऐवजी गरम पाणी प्यावे,शक्यतो थंड फ्रिजमधील पदार्थ टाळावेत,मास्क,सॅनिटायझर आदींचा वापर करावा.-डॉ.प्रमोद शिंदे,वैद्यकीय अधिक्षक,ग्रामीण रुग्णालय,मंगळवेढा.
मंगळवेढा शहरात 14 बेघर नागरिक आढळून आले आहेत.त्यापैकी 8 जण श्री दामाजी संस्था येथे तर 6 जणांची नगरपालिका शाळा नं. 1, नगरपालिका शाळा नं. 2,नगरपालिका शाळा नं. 4 या ठिकाणी राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त बेघर नागरिक आणखी कोणाच्या निदर्शनास आल्यास त्यांनी नगरपालिका प्रशासनाकडे संपर्क साधावा.-पल्लवी पाटील,मुख्याधिकारी,न.पा.मंगळवेढा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज