टीम मंगळवेढा टाईम्स ।
नैऋत्य मोसमी वारे देशातून परतून जवळपास एक महिना उलटून गेला आहे. तरीही यावर्षी महाराष्ट्रासह दक्षिण भारतात पावसाचा जोर कायम आहे.
दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात पावसाळा संपून उत्तरेकडील थंडीची लाट सुरू होते. पण यावर्षीचा हिवाळा मात्र याला अपवाद ठरला आहे.
राज्यात अजूनही अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा चढाच आहे. तर अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि अंदमान समुद्र परिसरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे अनेक ठिकाणांना पावसानं झोडपून काढलं आहे.
पुढील आणखी काही दिवस राज्यात पावसाची स्थिती कायम राहणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. पुढील चार दिवस राज्यात अनेक ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान खात्यानं आज मुंबईसह, पुणे, ठाणे, पालघर, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, बीड, लातूर, नांदेड, सोलापूर, उस्मानाबाद, सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 19 जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी केला आहे.
पुढील तीन ते चार तासांत याठिकाणी विजांच्या कडकडाटासह वेगवान वाऱ्यांच्या साथीनं जोरदार पावसाची शक्यता आहे. आज सकाळपासूनच याठिकाणी ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे.
याशिवाय आज जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली या पाच जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
दरम्यान आकाशात विजा चमकत असताना, घराबाहेर न पडण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.
उद्याही राज्यात कमी अधिक प्रमाणात हवामानाची हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. उद्या एकूण दहा जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे.
उद्या नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दहा जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. संबंधित जिल्ह्यांना उद्या येलो अलर्ट जारी केला आहे.
तर मुंबईसह उत्तर कोकण, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत. (स्रोत:News 18 लोकमत,)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज