टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनी धरणातील पळविलेले पाच टीएमसी पाणी वाचविण्यासाठी तसेच त्या संदर्भात निघालेला आदेश रद्द करावा यासाठी आता अंतर्गत मतभेद, पक्षभेद विसरून सर्वजण एकवटले आहेत. न्यायालयीन प्रक्रियेला वेग आला आहे.
दरम्यान, या लढ्यात सहभागी होण्यासाठी तालुक्यातील अनगरसह अन्य 103 ग्रामपंचायतींनी हिरवा कंदील दाखवला असल्याची माहिती स्व.यशवंतराव चव्हाण उजनी पाणी बचाव संघर्ष समितीचे निमंत्रक नागेश वनकळसे यांनी दिली. त्यामुळे पालकमंत्री विरुद्ध शेतकरी असा मोठा संघर्ष होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील 22 गावांचा पाणी प्रश्न निकाली काढण्यासाठी उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी सांडपाणी या गोंडस नावाखाली उचलण्याचा घाट घातला आहे.
वास्तविक, उजनीतील सर्व पाण्याचे यापूर्वीच योग्य वाटप झाल्याचे पाटबंधारे अधिकारी तसेच पाणी प्रश्नावर काम करणारे तज्ज्ञ सांगत आहेत. तसे पुरावेही आहेत. जिल्ह्यातील उजनीवर अवलंबून असलेल्या अनेक उपसा सिंचन तसेच पिण्याच्या पाण्याच्या योजना अपुऱ्या आहेत.
त्यात मोहोळ तालुक्यातील आष्टी, शिरापूर उपसा सिंचन, पोखरापूर टप्पा क्रमांक दोन यासह अनेक योजनांची कामे निधीअभावी रखडली आहेत.
सध्या सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या छायेत आहे. उजनी हे जिल्ह्याची वरदायिनी असून या धरणातील पाण्यावर केवळ सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा हक्क आहे. उजनीतील पाण्यावर अनेकांचे प्रपंच व अर्थकारण अवलंबून आहे.
असे असताना, पालकमंत्री भरणे यांनी उजनीतील पाच टीएमसी पाणी नेण्याचा घाट घातला आहे. याची जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुतरामही कल्पना दिली नाही, तर या कानाची माहिती त्या कानालाही कळू दिली नाही. दरम्यान, हे पाच टीएमसी पाणी उचलले तर शेतकरी देशोधडीला लागणार आहे.
अगोदरच आठमाही असलेल्या धरणातून हे पाच टीएमसी पाणी गेले तर पुन्हा पाणी मिळेल की नाही याची शाश्वती नाही. या पाच टीएमसी पाण्यासाठी गेला महिनाभर विविध शेतकरी संघटना आंदोलन करीत आहेत, तर जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांचे भीमानगर येथील उजनीच्या गेटसमोर कार्यकर्त्यांसह आंदोलन सुरू आहे.
याबाबत मार्ग काढण्यासाठी पुणे येथे एका बैठकीचा फार्स करण्यात आला. दरम्यान, निमंत्रक नागेश वनकळसे यांनी याबाबत न्यायालयात दाद मागण्याची तयारी सुरू केली असून, तालुक्यातील 104 ग्रामपंचायती या लढ्यात सक्रिय सहभागी होत आहेत.
या लढ्याची सुरवातच मोहोळ तालुक्याचे माजी आमदार राजन पाटील यांच्या अनगर ग्रामपंचायतीपासून सुरू झाल्याने इतर ग्रामपंचायतींना तसेच त्यांच्या सरपंच व इतर कार्यकर्त्यांना हत्तीचे बळ मिळाले आहे. त्यामुळे उजनीतील पाच टीएमसी पाणी नेण्याचा आदेश रद्द न झाल्यास मात्र पालकमंत्री विरुद्ध शेतकरी असा उघड संघर्ष होणार आहे.(सकाळ)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज