टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर ग्रामीण भागातील निर्बंध आज शुक्रवारपासून हटविण्यात आले असून, दुकाने रात्री ११ तर हॉटेल व रेस्टॉरंट रात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहतील, तसे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढले आहेत.
जलतरण तलाव सुरू करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत राज्य सरकारने यापूर्वीच निर्बंध हटविण्याचे निर्देश जारी केले.
या पार्श्वभूमीवर शहरात गुरुवारपासूनच निर्बंध हटवून सर्व व्यवहार सुरळीत सुरू ठेवण्यास महापालिका आयुक्तांनी ग्रीन सिग्नल दिला होता. शहर व ग्रामीण भागात दिवाळीच्या तोंडावर दुकानांची वेळ वाढवून देण्याची मागणी व्यापारी संघटनांनी केली होती.
शहरातील निर्णय एक दिवस अगोदर तर ग्रामीण भागातील निर्णय एक दिवस उशिराने घेण्यात आला आहे. या निर्णयाचे विविध व्यापारी संघटना व हॉटेल तसेच ढाबेचालकांनी स्वागत केले.
कोरोना रुग्णसंख्या घटत चालल्याने जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे निर्बंध हटविण्यात आले आहेत. नाट्यगृहे व चित्रपटगृहे सुरु करण्याबरोबरच खुल्या मैदानावरील कार्यक्रम घेण्यासही आता कोणतीही बंधने असणार नाहीत.
शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करणे बंधनकारक
निर्बंध हटविले असले तरी शासनाने घालून दिलेल्या कोरोनाविषयक मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करणे प्रत्येकाला बंधनकारक आहे , असेही आदेशात स्पष्ट केले आहे.
दोन्ही डोस पूर्ण केलेल्यांनाच मुभा
लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण केलेल्यांनाच मुभा राहणार असून , उर्वरित नागरिकांनीही लवकरात लवकर लसीचे दोन्ही डोस घ्यावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.(स्रोत:लोकमत)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज