मंगळवेढा टाइम्स न्युज नेटवर्क।
राजर्षी शाहू महाराजांच्या जयंती निमित्त कृष्णा खोऱ्यातील 13 दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील विशेषत: आटपाडी, सांगोले, मंगळवेढा व जत तालुक्यातील जनतेची 31 वी पाणी संघर्ष परिषद आज दि.26 जून रोजी मंगळवेढ्यात होणार असल्याची माहिती पाणी संघर्ष चळवळीचे अध्यक्ष प्रा.शिवाजीराव काळुंगे यांनी दिली.
या परिषदेमध्ये टेंभू, म्हैसाळ, सांगोले शाखा, उरमोडी, नीरा, देवघर इ. योजनांना केंद्र सरकारच्या पंतप्रधान कृषिसिंचन विकास योजनेत समावेश करून निधी उपलब्ध करून देणे, टेंभू, म्हैसाळ, सांगोले शाखा, उरमोडी, तारळी, ताकारी, धोम बलकवडी,
नीरा, देवधर इत्यादी योजनांचे पाणी समन्यायी वापराच्या तत्त्वावर आटपाडी, सांगोला, मंगळवेढा, जत, कवठेमहांकाळ, तासगाव, कडेगाव, खानापूर, मिरज पूर्व, पलूस, खटाव, खंडाळा, माण इत्यादी दुष्काळी तालुक्यांला मिळणे.
वरील योजनांच्या मुख्य कालव्यासाठी व पोट कालव्यांसाठी तसेच दि. 2 मे 2017 रोजी शासनाने जाहीर केलेल्या नवीन धोरणाप्रमाणे मुख्य कालव्यावर ठिकठिकाणी 100 हेक्टरच्या व त्यावरील सिंचनासाठी नवीन जलसाठे, लहान तलाव, पाझर तलाव, गाव तलाव, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे,
सध्या अस्तित्वात असलेले व नवीन साठे निर्माण करून नळाद्वारे त्यामध्ये पाणी साठविण्यासाठी निधीची व्यवस्था करणे, महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने पाण्याचे दर छोट्या शेतकऱ्यांना परवडण्या एवढेच ठेवावेत आणि समान पाणी वाटपाची अंमलबजावणीसाठी आग्रह धरणे.
चितळे जलआयोगाच्या शिफारशीनुसार शेतीवर राबून जगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमागे 1000 घनमीटर पाणी सिंचनासाठी उपलब्ध करण्याचे तत्त्व सर्व योजनांना लावून सरकारचे समन्यायी पाणी वाटप प्रत्याक्षात अवलंब करून देशाच्या सरासरी सिंचन टक्केवारी इतकी नेणे., भीमा, माण व कोरडा नदीला कालव्याचा दर्जा देऊन त्यावरील सर्व कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरून देण्यासाठी.
मंगळवेढा उपसा सिंचन योजना सुरू करण्यासाठी. उजनी उजवा कालवा व जत, सांगोला, मंगळवेढा तालुक्यातील म्हैसाळ 6 व्या टप्प्यातील अपूर्ण कामे पूर्ण करण्यास निधीची व्यवस्था करणे. आणि मागण्यावर यावर चर्चा करण्यात येणार असून यामध्ये वैभवकाका नायकवडी,
प्रा. डॉ. बाबुराव गुरव,अॅड. सुभाष पाटील, महादेव देशमुख, आ. राजेंद्रअण्णा देशमुख, प्रा. आर. एस. चोपडे,अॅड. सरफराज बागवान, डॉ. बाबासाहेब देशमुख, अनिल पाटील,प्रा. बाळासाहेब नायकवडी, भाई चंद्रकांत देशमुख,प्रा. दत्ताजीराव जाधव,अॅड. भारत पवार आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
उजनीचे पाणी तालुक्यातील पूर्ण लाभ क्षेत्राला मिळत नाही, मंगळवेढा उपसासिंचन योजनेचा प्रश्न शासन स्तरावर प्रलंबित आहे, म्हैसाळ योजनेचे पाणी देखील पूर्ण क्षेत्राला मिळून लाभक्षेत्रातील तलाव भरून देणेचा प्रश्न मार्गी लावण्याचे दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी तालुक्याकडे दुर्लक्ष केले. या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी ही पाणी परिषद निर्णायक ठरणार आहे.
पद्मभूषण क्रांतिवीर कै. डॉ. नागनाथअण्णा नायकवडी,भाई कै. डॉ. गणपतराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्ष पाण्यासाठी संघर्ष सुरू आहे, त्यामध्ये काही अंशी यश आले. अजूनही मंगळवेढ्यातील मुख्य पाणी प्रश्न रखडला आहे. दुसऱ्यांदा मंगळवेढ्यात पाणी परिषद होत आहे, नागरिकांनी उपस्थित रहावे.- शिवाजीराव काळुंगे, अध्यक्ष पाणी परिषद
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
![ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा](https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2021/12/WhatsApp-Add.gif)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज