टीम मंगळवेढा टाईम्स । उत्तर महाराष्ट्र ते अरबी समुद्रातील पूर्व भाग या दरम्यान चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे राज्यात जोरदार पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. आजपासून (ता.३) ते शनिवार (ता.७) पर्यंत कोकण, घाटमाथ्यावर, विदर्भाच्या पूर्व भागात जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा व विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे. Rains will intensify in ‘Ya’ area of the state from today
पश्चिम बंगाल आणि बांगलादेशाच्या परिसरात समुद्रसपाटीपासून २.१ ते ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. बंगालच्या उपसागराच्या ईशान्य भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे.
तर उत्तर भागात कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव आहे. तसेच उत्तर भारतात दाखल झालेल्या मॉन्सूनचा पट्टा गंगासागर ते बंगाल उपसागराच्या ईशान्य भागापर्यंत आहे.
याशिवाय राजस्थानच्या नैऋत्य भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. त्यामुळे कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई परिसरात दोन ते तीन दिवस मुसळधार पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातही मध्यम ते जोरदार पाऊस पडेल.
राज्यातील कोकण व मध्य महाराष्ट्रात गेल्या दोन ते तीन दिवसापासून ढगाळ हवामानाची स्थिती आहे. मराठवाडा व विदर्भातही ढगाळ वातावरणासह अधूनमधून पाऊस पडला. सोमवारी (ता.३) सकाळी आठ वाजेपर्यंत नागपूर येथे ११७.१ मिलिमीटर पाऊस पडला. तर अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, बुलडाणा जिल्ह्यातील काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.
मराठवाड्यात पावसाने उघडीप दिली असली तरी बहुतांशी भागात ढगाळ हवामान होते. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापुरातील गगनबावडा येथे ८९ मिलिमीटर पाऊस पडला असून धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, सांगली भागातही तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील बहुतांशी भागात जोरदार पाऊस पडला.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज