सोलापुर जिल्ह्यात ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या बळीराजाला दोन हजार 180 कोटींची मदत मिळाली. त्यातील 90 टक्क्यांहून मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याचे अहवाल सरकारला सादर झाले आहेत.
मात्र, ही मदत ऑक्टोबरपुरती मर्यादित नसून जून ते ऑक्टोबरपर्यंत झालेल्या नुकसानीची भरपाई असल्याची बाब समोर आली आहे. आता अनेकांनी मदत न मिळाल्याच्या तक्रारी तलाठ्यांकडे केल्या आहेत.
परतीच्या पावसातील नुकसानग्रस्तांना चार हजार 895 कोटींची मदत मिळावी, असे प्रस्ताव सरकारला पाठविण्यात आले. तत्पूर्वी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांच्यासह अन्य मंत्र्यांनी नुकसानीची पाहणी केली.
त्यानंतर सरकारने दहा हजार कोटींच्या मदतीची घोषणा केली. मात्र, त्यात शेतीसाठी अवघे 2 हजार 180 कोटी 54 लाख रुपयांचीच मदत मिळाली.
दिवाळीपूर्वी नव्हे तर आता त्याचे वाटप अंतिम टप्प्यात आले आहे. दरम्यान, अनेक तालुक्यांमध्ये 100 टक्के मदतीचे वाटप झाल्याचे संबंधित जिल्हा प्रशासनाने अहवालात नमूद केले आहे.
तर ही मदत ऑक्टोबरमधील नुकसानीची नसून जून ते ऑक्टोबरमधील अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालात नमूद करण्यात आल्याने आश्यर्च व्यक्त होत आहे.
आक्रमक शेतकऱ्यांना गावातील तलाठी दुसऱ्या हप्त्यात मदत मिळेल, असे आश्वासन देऊ लागले आहेत. मात्र, याबाबत मदत व पुनवर्सन विभागातील अधिकाऱ्यांनी तोंडावर बोट ठेवत सरकारकडे बोट दाखविले आहे.
सोलापूर जिल्ह्याचे 99.25 टक्के वाटप
सोलापुरातील दोन लाख 66 हजार 786 शेतकऱ्यांसाठी 984 कोटींची मदत मिळावी, असा प्रस्ताव पाठविला. त्यानुसार सरकारकडून सोलापूरसाठी 250 कोटी 71 लाख 83 हजार रुपये मिळाले. आता करमाळा, सांगोला व माळशिरस तालुक्यातील नुकसानग्रस्तांना शंभर टक्के मदतीचे वाटप झाले आहे.
तर बार्शी, अक्कलकोट, माढा, पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढ्यातील 99 टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांना मदत मिळाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने सरकारला पाठविला आहे.
एकूण मदतीपैकी आता एक कोटी 87 लाख 41 हजार रुपयांचे वाटप करायचे असल्याचेही त्यात नमूद करण्यात आले आहे.(सकाळ)
दुसऱ्या टप्प्यातील मदतीचा आणखी निर्णय नाही
जून ते ऑक्टोबर या काळात अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने मदत दिली. आता जिल्हानिहाय वाटप झालेल्या रकमेची माहिती मागविण्यात आली आहे.तर दुसऱ्या टप्प्याबाबत सध्यातरी काही निर्णय झालेला नाही.– सुभाष उमराणीकर, उपसचिव, मदत व पुनर्वसन
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज