टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यात सतत पाचव्या नक्षत्रातही पावसाने दमदार हजेरी लावली. शुक्रवार व शनिवारी दुपारी सर्वत्र पाऊस पडला. पूर्व भागातील तालुक्यात मुसळधार वृष्टी करीत हाहाकार उडवून दिला, तर पश्चिम भागातील तालुक्यात संततधार पाऊस झाला.
सकाळपर्यंत जिल्ह्यात २७० मिलिमीटर पाऊस झाला. अक्कलकोटमध्ये मुसळधार पडलेल्या पावसामुळे तालुक्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले. सीमावर्ती भागात प्रवासी वाहतूक जीप पाण्यात अडकली. दोन दुचाकीस्वार वाहून गेले, मात्र ग्रामस्थांच्या प्रसंगावधानाने ते वाचले. सबंध जिल्ह्यात हा पाऊस सर्वदूर झाला. यामुळे बळीराजा सुखावला आहे.
चपळगाव : पुष्य नक्षत्राच्या पावसाने शुक्रवारी सकाळपासूनच चपळगाव मंडलात जोरदार हजेरी लावली. यामुळे अक्कलकोट-तुळजापूर मार्गावरील चपळगाव जवळच्या ओढ्यावरील ८ फूट उंचीचा भरावा वाहून गेला आहे.
यामुळे बोरी व हरणा नदी प्रवाहित झाल्याने कुरनूर धरणाच्या जलसाठ्यात भर पडत आहे. जवळपास तीन तास पडलेल्या पावसाने चपळगाव, हन्नूर, चुंगी, पितापूर, डोंबरजवळगे, चपळगाववाडी, दहिटणे, किणी, सिंदखेड, मोट्याळ, कुरनूर आदी गावांसह पंचक्रोशीला चांगलेच झोडपले. या पावसाने नद्या, नाले, लघुप्रकल्प, मध्यम प्रकल्पासह इतर जलस्त्रोत प्रवाहित झाल्याचे पाहावयास मिळाले.
सलग चार तास पडलेल्या पावसाने करजगी येथील जुने वाठलेले एकशे दहा वर्षांपूर्वीचे चिंचेचे झाड उन्मळून पडले. त्यामुळे पानमंगरुळ ते करजगी रस्त्यावरची वाहतूक तब्बल सहा तास खोळंबली. ग्रामस्थांनी हे झाड रस्त्यावरून बाजूला केले. शुक्रवारी सकाळी नऊ वाजल्यापासून करजगी, पानमंगरुळ, सुलेरजवळगे या गावात जोरदार पावसाला सुरुवात झाली. चार तास सलग पाऊस पडल्याने नद्या-नाल्यांनी पाणी वाहू लागले.
तालुक्याची वरदायिनी असलेल्या कुरनूर धरण गळोरगी, शिरवळवाडी, घोळसगाव, किरनळ्ळी येथील साठवण तलाव, हंजगी आदी गावच्या साठवण तलावात पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. तसेच तोरणी, खानापूर, गळोरगी, कोन्हाळी, मुंढेवाडी, बोरोटी बु., भोसगे, मुगळी, मराठवाडी, गुड्डेवाडी, दोड्याळ, घुंगरेगाव, बासलेगाव आदी गावातून पावसाचे पाणी ओढा वाहिल्यासारखे वाहत होते. या गावच्या परिसरातील लहान-मोठे ओढे भरून वाहिले.
शुक्रवारी सकाळपासून मुसळधार पाऊस होत असल्याने बासलेगाव-गळोरगी रस्त्यावरील ओढा भरून पुलावरून पाणी वाहत होते. जकापूर येथील गवळी प्रकाश हन्नुरे (४०, रा. जकापूर) हे दूध घेऊन अक्कलकोटकडे येत होते. पाऊस सुरू असताना धाडस करून वेगाने वाहणाºया पाण्यातून दुचाकी चालवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेगामुळे ते खाली पडून वाहत जाताना प्रसंगावधान ओळखून बासलेगाव येथील विश्वनाथ साखरे, राम गायकवाड, सागर पाटील यांनी त्यांना वाचविले, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज