टीम मंगळवेढा टाईम्स । गेल्या काही दिवसांपासून पावसाने उसंत घेतलीये. मात्र दडी मारून बसलेला पाऊस राज्यामध्ये पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढच्या 4 ते 5 दिवसांमध्ये राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवलाय.
पुढच्या 4 ते 5 दिवसांत मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कोकणात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता असल्याचं ट्विट प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसळीकर यांनी केलंय. याचप्रमाणे सोमवारपासून पावसाचा जोर वाढेल तसंच घाट भागातही अतीमुसळधार पावसाची शक्यता असल्याचं होसळीकर यांचं म्हणणं आहे.
सर्वाधिक पावसाच्या कोकण विभागातील पालघर, रायगड, ठाणे जिल्ह्यासह आता रत्नागिरीतील पाऊसंही सरासरीच्या तुलनेत मागे पडतोय.
मध्य महाराष्ट्रातील साताऱ्यापाठोपाठ पुणे, नाशिक आणि कोल्हापूरमध्येही पावसाचे प्रमाण कमी असल्याचं दिसून आलंय. अशात हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजामुळे दिलासा मिळू शकतो.
विदर्भात दोन-तीन जिल्हे वगळता सर्वच भागांत पाऊस सरासरीच्या तुलनेत मागे आहे. मराठवाड्यात मात्र पावसाने जुलैची सरासरी ओलांडली आहे. मुंबई परिसर, कोकणातील काही भाग आणि मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावलीये. इतरत्र पावसाने विश्रांती घेतल्याने पाणीसाठय़ातील वाढ थांबली असून, शेतकऱ्यांकडूनही चिंता व्यक्त केली जात आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज