मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढ्यातील आठ गावांमध्ये म्हैसाळचे पाणी येणार असून याला शासनाने तत्वतःमान्यता दिली असल्याची माहिती शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्या शैला गोडसे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख तुकाराम कुदले,नारायण गोवे,सलगर (बु) चे रामचंद्र जाधव,उपजिल्हाप्रमुख तुकाराम भोजने, विनोद कदम आदीजन उपस्थित होते.
सुमारे दोन वर्षांपासून मंगळवेढ्यातील दक्षिण भागामध्ये वर्षानुवर्षे पडणाऱ्या दुष्काळाची तीव्रता कशी कमी करता येईल यासाठी शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख या नात्याने या भागातील गावोगावी जाऊन घरोघरी जाऊन परिस्थिती जाणून घेतली.
त्यावेळी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची कामे अपूर्ण असल्याने तोपर्यंत मंगळवेढ्याच्या हक्काचे पाणी शिरनांदगी तलावामध्ये सोडण्यात यावे म्हणून शिरनांदगी तलावामध्ये सहा दिवस ठिय्या आंदोलन केले. तसेच प्रशासनाबरोबर संघर्ष केला.
दरम्यानच्या कालावधीत म्हैसाळ योजनेचे मंगळवेढ्याच्या हद्दीतील बंद पाईपलाईन टाकण्यासाठीचे खोदकाम सुरू झाले होते. काम सुरू असताना काम व्यवस्थित होते आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी तसेच या पाईपलाईनमधून मंगळवेढ्याच्या हद्दीतील पाझर तलाव, गावतलावामध्ये पाणी सोडता यावे म्हणून आऊटलेट बसवावे म्हणून या भागातील शेतकऱ्यांसह सुरू असलेल्या कामाची पाहणी केली त्यावेळी असे लक्षात आले की,
मंगळवेढ्याच्या आणि जत तालुक्याच्या हद्दीवरून बंद पाईपलाईनचा जो कालवा जात आहे. त्या पाईपलाईनमधून जत तालुक्यातील क्षेत्र सिंचनाखाली येत आहे परंतू मंगळवेढ्याच्या हद्दीतील लवंगी, आसबेवाडी, सलगर (खू.), सलगर (बु), शिवनगी, सोड्डी, येळगी, हुलजंती या गावांचा प्रकल्प अहवालामध्ये समावेशच नाही.
त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचा असंतोषाचा उद्रेक झाला आणि सुरू असलेले काम शेतकऱ्यांनी बंद पाडले आणि या प्रसंगापासून या आठ वंचित गावांचा समावेश म्हैसाळ योजनेमध्ये करण्यासाठी आणि या गावांना पाणी मिळवून देण्यासाठी मा.ना.डॉ.प्रा.तानाजीराव सावंत साहेब यांच्या नेतृत्वाखाली माझा संघर्ष सुरू झाला.
सलगर (बु) चे रामचंद्र जाधव, गणपती चौधरी, अनिल कदम, अनिल जाधव, आसबेवाडीचे संजय नागणे, भागवत भुसे, रमेश आसबे, शिवणगीचे जकराय्या सोमुते, निणाप्पा पडवळे, सोड्डीचे शांताप्पा बिराजदार, येळगीचे सचिन चव्हाण, लवंगीचे मदन घाटगे, समीर जाधव इत्यादी प्रमुख शेतकऱ्यांच्या
आम्ही जलसंधारणमंत्री मा.ना.डॉ.प्रा.तानाजीराव सावंत साहेब यांची त्यांच्या पुणे येथील कार्यालयामध्ये समक्ष भेट घेतली आणि आमच्यावर अन्याय झाला असून आमची गांवे जोपर्यंत म्हैसाळ योजनेत समावेश होत नाहीत तोपर्यंत म्हैसाळ योजनेचे काम होवू देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी सावंत यांच्याकडे मांडली तसेच आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण हा विषय हाती घेऊन मार्गी लावावा अशी विनंती शेतकऱ्यांच्यावतीने त्यांना करण्यात आली.
मंत्री तानाजीराव सावंत साहेबांनी हा विषय समजून घेतला आणि या शेतकऱ्यांवर खरोखरच अन्याय होत असल्याचे दिसून आल्याने त्यांनी जलसंपदा राज्यमंत्री मा.ना.विजय (बापू) शिवतारे साहेब यांच्याकडे जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासह मंत्रालयामध्ये बैठक लावण्याची विनंती केली त्यानुसार दिनांक 27/2/2019 रोजी जलसंपदामंत्री मा.ना.विजय (बापू) शिवतारे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आणि ही वंचित गावे म्हैसाळ योजनेमध्ये समावेश करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे आदेश कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीला मंत्री तानाजीराव सावंत साहेब, मी स्वत: शैला गोडसे, सहसंपर्क प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, जिल्हा प्रमुख संभाजीराव शिंदे, संतोष माने, संजनाताई घाडी या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक
खलील अन्सारी साहेब, अधिक्षक अभियंता हनुमंत गुणाले, कार्यकारी अभियंता विजय पाटील या प्रमुख अधिकाऱ्यांशिवाय मंगळवेढ्याच्या वंचित गावातील सलगर (बु)चे रामचंद्र जाधव, अनिल जाधव, आसबेवाडीचे संजय नागणे, समाधान आसबे, रमेश आसबे, शिवणगीचे जकराया सोमुते, येळगीचे सचिन चव्हाण, लवंगीचे समीर जाधव इत्यादी प्रमुख शेतकरी उपस्थित होते.
त्यानंतर म्हैसाळ योजनेच्या सांगली येथील कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांना भेटून सर्वप्रथम वंचित असलेल्या आठ गावातील सर्वेक्षणाचे काम करून घेतले आणि जास्तीत जास्त क्षेत्राचा समावेश कसा करता येईल असा नकाशा आणि प्रस्ताव तयार करून घेवून सांगलीच्या कार्यालयाकडून पुणे येथील मुख्य अभियंता कार्यालयाकडे सादर केला. हा प्रस्ताव मुंबईपर्यंत सादर होण्यासाठी माझ्यासह शेतकऱ्यांच्यावतीने सलगरचे रामचंद्र (बंडू) जाधव आणि आसबेवाडीचे संजय नागणे यांनी किमान 10 वेळा सांगली व पुणे येथे पाठपुरावा केला.
त्यानंतर ज्या ज्या वेळी आवश्यकता भासेल त्या त्यावेळी मा.ना.डॉ.तानाजीराव सावंत यांच्यामार्फत अधिकाऱ्यांना फोनवर तसेच प्रत्यक्ष भेट घेवून पाठपुरावा केला आणि शिफारशीसह प्रस्ताव मंत्रालयामध्ये शासनाकडे सादर झाला.
त्यानंतर मंत्रालयामध्ये जलसंपदामंत्री मा.ना.गिरीष महाजन साहेब यांची त्यांच्या दालनामध्ये मा.ना.डॉ.तानाजीराव सावंत साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेऊन निवेदन दिले त्यावेळी माझ्यासह सलगरचे रामचंद्र जाधव आणि आसबेवाडीचे चंद्रकांत आसबे विनोद कदम उपस्थित होते. त्यानंतर मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करीत असताना काही त्रुटी उपस्थित झाल्या.
या त्रुटीची पूर्तता पुणे येथील कार्यालयाकडून हातोहात करून घेतल्या.त्यानंतर दिनांक 13/8/2019 रोजी कॅबिनेटमंत्री मिटींगचे वेळी पुन्हा मा.ना.डॉ.तानाजीराव सावंत साहेब यांनी जलसंपदामंत्री मा.ना.गिरीष महाजन साहेब, त्यांचे खाजगी सचिव तसेच जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे प्रस्तावास मान्यता देण्याबाबत पाठपुरावा केला.
अखेर या पाठपुराव्याला यश आले असून शासनाने त्यांचे दि.१६ सप्टेंबर रोजीच्या पत्रान्वये मंगळवेढ्याच्या हद्दीतील परंतू पाण्यापासून वंचित असलेली आठ गावांचा म्हैसाळ योजनेमध्ये नव्याने समावेश करण्यासाठी तत्वत: मान्यता दिली आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मलाही आनंद वाटत आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज