मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोनामुळे जग हादरून गेलं आहे. अशातच भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी भारत सरकार आणि सर्व राज्यांमध्येही कठोर उपाययोजना केल्या जात आहेत. दरम्यान, एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पश्चिमी चंपारणच्या जिल्हाधिकाऱ्यांचं पत्र समोर आलं आहे. सीमेपलिकडून काही लोक भारतात आणि विशेषत: बिहारमध्ये कट रचून कोरोना व्हायरसचं संक्रमण पसरवण्याच्या तयारीत असल्याचं यात म्हटलं आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच जे पत्र आहे त्यामध्ये एसएसबी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडून सीमा सुरक्षा दलाला काही सूचना देण्यात आल्या आहेत. नवभारत टाइम्सने हे पत्र प्रसिद्ध केलं आहे. त्यात म्हटलं आहे की, सीमेपलिकडून कोरोनाचा संसर्ग झालेले संशयित भारतात पाठवण्यात आले आहेत. या पत्रानुसार 40 ते 50 कोरोनाचे रुग्ण असल्याचं म्हटलं आहे. भारतात कोरोना पसरण्याचा यांचा उद्देश आहे.
पत्रानुसार भारतात दाखल होणारे हे शस्त्र तस्करी करणारे आहेत. त्यामध्ये जालिम मुखिया नावाच्या व्यक्तीचा उल्लेख असून तो नेपाळमधील पारसा जिल्ह्यातल्या जगन्नाथपूर इथला आहे. जालिम मुखियाच्या कटानुसार कोरोना संसर्ग झालेल्या संशयित रुग्णांना नेपाळच्या बॉर्डरवरील रस्त्यानं भारताकडे पाठवण्यात आलं आहे. यामुळे सीमा सुरक्षा बलानं त्यांचा पहारा कडक करावा आणि दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांचे हे पत्र समोर आल्यानंतर गृहसचिव अमीर सुबानी यांनी सांगितलं की, सर्व बाजूंनी याचा तपास केला जात आहे. गृहमंत्रालयाला माहिती देण्यात आली आहे. कोणालाही अशा प्रकारे देशात घुसू दिलं जाणार नाही. प्रकरण नेपाळमध्ये असलं तरी आम्ही आपल्या अधिकाऱ्यांना सावध केलं आङे. अद्याप असे लोक देशात घुसले नसले तरी मिळालेल्या माहितीनुसार त्यांची तयारी सुरू आहे.
गेल्या दोन दिवसांत बिहारमध्ये अचानक कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. आतापर्यंत 60 लोकांना कोरोनाची लागण झाली असून 15 जण बरे झाले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या या पत्राने राज्यासह देशात खळबळ उडाली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज