मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । लग्नाच्या एक दिवस अगोदर लग्नाला नकार देऊन नवरदेव फरार झाल्याची घटना घडली आहे. मुलगी पंसत नाही म्हणत लग्नास नकार देणाऱ्या नवरदेवासह त्याच्या आई-वडिलांवर कुरुंदा पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. दोन) गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसमत तालुक्यातील सुकळी येथील मुलीचा विवाह ढोलक्याची वाडी (ता. कळमनुरी) येथील संदीप पाचपुते याच्यासोबत ठरला होता. तसेच यासाठी एक लाख ७५ हजार रुपये, पाच ग्रॅमची अंगठी, कपडे आदी वस्तू देण्याचे ठरले होते. त्यांनतर डिसेंबर महिन्यात सुकळी येथे साखरपुडादेखील झाला. या वेळी वधू – वराकडील पाहुणे मंडळी, गावकरी सहभागी झाले होते.
साखरपुड्यात ठरलेली रक्कम तसेच अंगठी देण्यात आली. तसेच नवीन कपडेदेखील नवरदेवाला देण्यात आले. त्यानंतर मार्च महिन्यात (ता. तीन) विवाहाचा मुहूर्तदेखील ठरला. त्याप्रमाणे वधू मंडळीकडून संपूर्ण तयारी करण्यात आली. लग्नपत्रिका नातेवाइकांना वाटप करण्यात आल्या. लग्नाची तिथी जवळ आली. परंतु, लग्नाच्या एक दिवस अगोदर सोमवारी (ता. दोन) नवदेवाचे वडील शिवप्रसाद पाचपुते यांनी नवरदेवास मुलगी पसंत नसल्याचे सांगून तो लग्नास तयार नसल्याचे वधूकडील मंडळीस सांगितले. त्यामुळे वधू पित्याला मोठा धक्काच बसला. लग्नाची संपूर्ण तयारी झाली, पाहुणे मंडळीदेखील घरी आले.
मात्र, नवरदेवाकडून लग्नास नकार आल्याने पाहुणे मंडळींनीही संताप व्यक्त केला. याप्रकरणी रामभाऊ चौरे यांच्या फिर्यादीवरून नवरदेव संदीप पाचपुते, वडील शिवप्रसाद पाचपुते, आई उषा पाचपुते यांच्या विरोधात कुंरुदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल होताच नवरदेवासह त्याचे आई-वडील पसार झाले आहेत. कुरुंदा पोलिसांनी नवदेवासह नवरदेवाच्या आई – वडिलांच्या अटकेसाठी वसमत येथील न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले असून न्यायालयाच्या परवानगीनंतर त्यांना अटक केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज