मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
वाळू माफियांच्या अवाढव्य ‘ड्रेझर’ आणि यंत्रांच्या हव्यासामुळे भीमेचं अस्तित्व आज खऱ्या अर्थाने धोक्यात आलं आहे. नदीपात्रातून होणाऱ्या अवाजवी आणि बेसुमार वाळू उपशामुळे निसर्गदत्त असलेलं भीमा नदीचं पात्र अक्षरशः छिन्नविच्छिन्न झालं असून, ठिकठिकाणी पडलेल्या खोल खड्ड्यांमुळे पर्यावरणाचा नैसर्गिक समतोल पूर्णपणे कोलमडला आहे.

नदीची पाणी साठवून ठेवण्याची नैसर्गिक क्षमता संपत चालली असून, हा केवळ वाळूचा उपसा नसून भविष्यातील पाणीटंचाईची ही भयावह नांदी ठरत आहे. जर वेळीच हा ओरबाडण्याचा प्रकार थांबला नाही, तर भीमा काठच्या गावांना केवळ कोरड्या पात्राकडे पाहून अश्रू गाळावे लागतील, असे गंभीर संकेत आता स्पष्टपणे दिसू लागले आहेत.

मंगळवेढा तालुक्यातील जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या भीमा नदी पात्रात सध्या नियमांचा अक्षरशः चुराडा होताना दिसत आहे. पर्यावरणाचे सर्व नियम धाब्यावर बसवून नदीपात्रात पोकलेन, जेसीबी आणि डंपरच्या साहाय्याने बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असून,

वाळू माफियांनी नदीचे पात्र अक्षरशः ओरबडून काढले आहे. विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार दिवसाढवळ्या सुरू असतानाही महसूल प्रशासन मात्र ‘धृतराष्ट्रा’च्या भूमिकेत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
भीमा नदी: वाळू उपसा आणि वादाचे भोवर
सध्या भीमा नदी दुथडी भरून वाहत असतानाही वाळू उपसा सुरू आहे. मात्र, हा उपसा ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर ETS (Electronic Total Station) मशीनद्वारे मोजमाप करण्याची मागणी जोर धरत आहे.

मर्यादेचे उल्लंघन:
नदीपात्रातून नेमकी किती ब्रास वाळू काढली गेली आहे, याची अचूक आकडेवारी शेतकरी वर्ग मागत आहे. प्रशासनाने दिलेल्या परवानगीपेक्षा जास्त खोदकाम झाले आहे का,? हे ETS मशिनद्वारे मोजमाप केल्यानंतर स्पष्ट होणार आहे.

यंत्रांचा ‘थैमान’ आणि नियमांची पायमल्ली
मिळालेल्या माहितीनुसार, भीमा नदीच्या पात्रात सध्या जडयंत्रांनी अक्षरशः थैमान घातले आहे. नियमानुसार नदीपात्रात यंत्रांच्या साहाय्याने उपसा करण्यास सक्त मनाई असतानाही, येथे मात्र पोकलेनच्या साह्याने खोलवर खड्डे पाडून वाळू उपसली जात आहे.

यामुळे नदीची नैसर्गिक रचना धोक्यात आली असून भविष्यात पाणीटंचाई आणि पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होण्याची भीती व्यक्त होत आहे.
प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात
एकीकडे सरकार अवैध गौण खनिज उत्खननावर कठोर कारवाईचे आदेश देते, तर दुसरीकडे मंगळवेढ्यात मात्र वाळू माफियांचे ‘राज’ सुरू असल्याचे चित्र आहे. नदीपात्रातून शेकडो टिपर वाळू रोज बाहेर काढली जात असताना, महसूल विभागाच्या भरारी पथकाला हे दिसत नाही का? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.

नागरिकांचा सवाल: हा उपसा नेमक्या कोणत्या नियमात?
“नदीपात्रात जडयंत्रे उतरवण्यास परवानगी कुणी दिली? दिवसाढवळ्या होणारी ही लूट रोखण्यासाठी प्रशासन का धजावत नाही? प्रशासनाने वेळीच लक्ष दिले नाही तर भविष्यात भीमा नदीचे अस्तित्व धोक्यात येईल,” अशी भावना स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
दोषींवर कारवाई होणार का?
वाळू उपशामुळे नदीकाठच्या गावांमधील रस्त्यांचीही वाट लागली असून अवजड वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. आता या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून दखल घेतली जाणार का आणि ‘सुस्त’ महसूल यंत्रणा जागी होणार का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












