टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील सर्व अधिकारी पदाधिकारी व सामान्य जनता यांनी एकत्रित बसून तालुक्यातील सर्व प्रश्नावर चर्चा करून मार्ग काढण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे आमसभा.
पण गेल्या आठ वर्षापासून मंगळवेढ्याची आमसभाच न झाल्याने अनेक प्रश्न प्रलंबित राहिले असून या वर्षात तर आ समाधान आवताडे आमसभा घेणार का ?असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.
मंगळवेढ्याची आमसभा आठ वर्षापूर्वी २५ फेब्रुवारी २०१३ रोजी झाली होती. ही आमसभा अत्यंत वादळी स्वरूपात झाली होती. अधिकारी व पदाधिकारी यांच्यात हमरी तुमरी पर्यंत वाद झाले होतेे.
त्याचबरोबर अनेक प्रश्नावरती विधायक चर्चाही झाल्या होत्या. मात्र, त्यानंतरच्या २०१४ च्यावर्षी विधानसभेच्या आचारसंहितेमुळे आमसभा होऊ शकली नाही. तर नंतरच्या वर्षी अधिवेशन असल्याने आमसभा होऊ शकली नाही.
त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत पाच वर्ष दिवंगत आमदार भारत भालके यांच्या गटाची पंचायत समितीमध्ये सत्ता होती त्यामध्ये पहिली अडीच वर्षे संभाजी गावकरे यांनी तर नंतरची अडीच वर्षे निर्मला काकडे यांनी सभापती पद भुषविले होते.
सध्या पाच वर्षे आवताडे गटाची सत्ता असून त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाल संपत आला आहे मात्र सरतेशेवटी एखादी आमसभा व्हावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे.
दरवर्षी आमसभा झाली असती तर अनेक प्रश्नांना वाचा फुटली असती मात्र, आठ वर्षे आमसभा ना घेता कारभार चालवणाऱ्या पंचायत समितीच्या कारभा-यानी आमसभा न घेण्याचा पराक्रम केला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
आमसभेचे नियोजन हे पंचायत समिती कडून करण्यात येते. गटविकास अधिकारी व सभापती यांनी नियोजन करून आमदारांची तारीख घेतली जाते व सर्व खात्याच्या अधिकाऱ्यांना कळवून आमसभा घेतली जाते.
आमसभेमध्ये वर्षभराच्या कामकाजाचा आढावा घेतला जातो. आमसभेचा पदषिध्द अध्यक्ष आमदार असतात. सर्व अधिकारी लोकप्रतिनिधी व तालुक्यातील नागरिक एकत्रित सर्व विषयावर चर्चा, तक्रारी, रखडलेली कामे, झालेली कामे, याचा आढावा आमदार घेत असतात.
पण आमसभाच न झाल्याने तालुक्यात नेमके चाललय तरी काय? हे समजेनासे झाले आहे.
सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे, रखडलेल्या कामांकडे आतापर्यंत दुर्लक्ष झाले असून या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी पं.स कडून त्वरित आमसभेचे नियोजन करणे गरजेचे आहे.
विद्यमान आमदार समाधान आवताडे हे निवडून आल्यापासून पायाला भिंगरी बांधून लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी झटत आहेत अशा परिस्थितीत आमसभा लावली तर सर्व खात्याच्या समस्या, प्रश्न अडचणी या एका ठिकाणी समजून येतील त्यामुळे त्यांनी आमसभेच्या वेळ देऊन आमसभा घेणे गरजेचे आहे.(स्त्रोत:पुण्यनगरी)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज