टीम मंगळवेढा टाईम्स ।
पुन्हा एकदा शासनाने पायी वारीबाबत निर्णय घेताना वारकरी संप्रदायाच्या भावनांचा अनादर केला आहे. शासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असे आवाहन वारकरी संप्रदाय युवा मंच महाराष्ट्रचे अध्यक्ष अक्षयमहाराज भोसले यांनी केले आहे.
बसमधून मानाच्या दहा पालख्यांना परवानगी देण्याच्या शासनाने घेतलेल्या निर्णयानंतर वासकर वाडा पंढरपूर येथे अक्षयमहाराज बोलत होते.
मागील वर्षी कोरोना हा आजार लोकांना नवीन होता. तीव्रता अधिक होती. कडक लॉकडाउन होते, तरीही पंढरपूरसारख्या ठिकाणी हजारोंच्या उपस्थितीत राजकीय मेळावे झाले.
अक्षयमहाराज म्हणाले, मागील वर्षी कोरोना हा आजार लोकांना नवीन होता. तीव्रता अधिक होती. कडक लॉकडाउन होते, तरीही पंढरपूरसारख्या ठिकाणी हजारोंच्या उपस्थितीत राजकीय मेळावे झाले.
मंत्री तथा विरोध पक्षाचे अनेक नेते पंढरपुरात रात्रंदिवस ठाण मांडून बसले होते. तेव्हा कोरोना फिरायला बाहेर गेला होता. आता वारी आहे, त्यामुळे तो माघारी येईल असे प्रशासनाला वाटते आहे का? ज्यांचे लसीकरण झालं आहे. अशांना केवळ परवानगी द्या, असेही आम्ही मागे वारंवार सांगितले होते.
जेव्हा अतिमहत्त्वाच्या व्यक्ती येतात, तेव्हा मात्र सुरक्षा पुरवली जाते. आता वारीच्या वेळी गर्दी कशी नियंत्रित करणार या सारखे प्रश्न विचारले जातात याचे आश्चर्य वाटते. वारकरी शिस्तीचे पालन करणारे आहेत. शासनाने कठोर निर्बंध घालावेत. मात्र, सोहळा पायी होऊ द्यावा.
अक्षयमहाराज पुढे म्हणाले, ज्येष्ठांची चिंता असेल तर वयाचे बंधन घालावे. वारीमध्ये अलीकडच्या काळात प्रत्येक संस्थान व दिंडी यामध्ये युवा पिढी मोठ्या संख्येने नेतृत्व करते. आम्हाला तेही मान्य असेल, अगदी त्याबाबतची संख्या ही शासनाने ठरवावी याबाबत आमचे दुमत नाही.
मात्र, सोहळा हा पायीच झाला पाहिजे. ज्या अधिकारी वर्गाला वारकरी वर्गाविषयी माहिती आहे, असे अधिकारी त्या समितीवर नेमावेत. ज्यांचा दुरान्वये सुद्धा संप्रदायाशी संबंध नाही ते काय अहवाल सादर करतील? किमान ही गोष्ट मायबाप सरकारने लक्षात घ्यावी.
प्रशासनाला पूर्णतः सहकार्य करण्याची भूमिका संपूर्ण वारकरी संप्रदायाची आहे. मात्र, सोहळा हा पायीच झाला पाहिजे यावर संपूर्ण वारकरी संप्रदायाचे एकमत आहे.
सदर बैठकीस राणामहाराज वासकर, कबीरमहाराज, रामकृष्णमहाराज वीर, कराडकरमहाराज, कंधारकरमहाराज, अनेक संतांचे वंशज व समस्त वारकरी फडकरी युवा वर्ग, वारकरी पाईक संघ सदस्य उपस्थित होते.
वारकरी संप्रदाय हे महाराष्ट्राचे वैभव आहे. शासनाला कोरोनापासून वारकरी वर्गाला त्रास होण्याची भीती जाणवत असेल, तर खास पायी वारी करणाऱ्या वारकरी वर्गासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग पंढरपूर येथे सुसज्ज असे सर्व अत्याधुनिक सुविधा असणारे कोविड सेंटर निःशुल्क उभारेल व त्यांच्या उपचाराची जबाबदारी घेईल.- शेखर मुंदडा, विश्वस्त, आर्ट ऑफ लिव्हिंग महाराष्ट्र
सेवानिवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, सुबराव पाटील तसेच मल्लिनाथ कलशेट्टी, संदीप पाटील, इंद्रजित देशमुख यांच्या सारखे अनुभवी अधिकारी समितीवर नेमावेत. ज्यांना वारी व वारकरी वर्ग या विषयी जिव्हाळा व आत्मीयता आहे. -अक्षयमहाराज भोसले
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज