टीम मंगळवेढा टाईम्स ।
मराठा आरक्षण टिकवण्यासाठी केंद्र सरकारप्रमाणेच राज्य सरकारनेही सर्वोच्च न्यायालयात फेरविचार दाखल करावी अशी मागणी भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रं लिहून ही मागणी केली आहे.
खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रं लिहून मराठा आरक्षण टिकवण्यासाठी काय करता येईल याकडे लक्ष वेधलं आहे.
न्यायालयाने मराठा आरक्षणावर अंतिम निकाल देताना 102व्या घटनादुरूस्तीमुळे राज्य शासनास आरक्षण देण्याचे अधिकार नसल्याचे मत नोंदविले आहे. याबाबत केंद्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली आहे.
त्याच पद्धतीने हा संपूर्ण विषय महाराष्ट्र शासनाशी व शासनाला असलेल्या अधिकारांशी थेट निगडीत असल्याने, तसेच राज्य मागासवर्ग आयोगाचा संपूर्ण अहवाल न्यायालयासमोर ठेवताना राहिलेल्या त्रूटी दूर करण्यासाठी व अंतिमतः मराठा आरक्षण टिकविण्यासाठी महाराष्ट्र सरकारनेही सर्वोच्च न्यायालयात अशी फेरविचार याचिका दाखल करण्यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही त्वरीत करण्यात यावी अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे.
मराठा आरक्षण टिकविण्यासाठी केंद्र सरकार प्रमाणेच राज्य सरकारनेही फेरविचार याचिका दाखल करावी, याबाबत मा. मुख्यमंत्र्यांस पत्र लिहिले… pic.twitter.com/bSEenLozmS
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) May 14, 2021
राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर आधारित महाराष्ट्र विधिमंडळाने पारीत केलेला मराठा आरक्षण कायदा (2018) सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरविला आहे. याबाबत निर्णय देत असताना सर्वोच्च न्यायालयाने काही मुद्दे मांडलेले आहेत; त्यापैकी 102 व्या घटनादुरूस्ती नंतर राज्यांना मागास प्रवर्ग ठरविण्याचे अधिकार राहत नाहीत, असे मत नोंदविले आहे, असं संभाजीराजे यांनी सांगितलं आहे.
गेहलोत यांचीही भेट घेतली
102 वी घटनादुरूस्ती राज्यसभेत मंजूर करण्यापूर्वी सिलेक्ट कमिटी नेमली गेली होती. 25 खासदारांच्या या समितीपुढे हा विषय ठेवण्यात आला. या समितीने आपल्या अहवालामध्ये 12 व्या मुद्द्यात ‘या घटनादुरूस्तीमुळे राज्य मागासवर्ग आयोगांना मागास यादीमध्ये एखादा प्रवर्ग समाविष्ट करण्याचा असलेला अधिकार बाधित होत नाही,’ असे स्पष्टपणे नमूद केले आहे.
मराठा आरक्षणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू असताना 102 वी घटनादुरूस्ती व राज्यांचे अधिकार यांबाबत संभ्रम निर्माण झाला होता. यावेळी मी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांची भेट घेऊन केंद्र सरकारच्या वतीने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून हा संभ्रम दूर करावा, अशी विनंती केली होती.
केंद्र सरकारच्या वतीने न्यायालयात राज्यांचे अधिकार बाधित होत नसल्याचे स्पष्टपणे मांडण्यात आले, असं त्यांनी सांगितलं.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज