टीम मंगळवेढा टाईम्स।
साफल्यपूर्ण जीवन जगण्याची प्रेरणा शिवचरित्रातून मिळत असली तरी देव देश अन धर्मासाठी बलिदान देऊन छ.संभाजीराजे स्वराज्याच्या इतिहासात अजरामर झाले असे प्रतिपादन छत्रपती परिवाराचे संस्थापक सुरेश पवार यांनी केले.
मरवडे येथे छत्रपती संभाजीराजे बलिदान दिनाचेनिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पवार यांनी आमचं रक्त सांडून जर स्वराज्याचे स्वधर्माचे रक्षण होणार असेल तर केवळ या मातीत रक्त सांडण्यासाठी जन्म घेऊ असं अभिमानाने सांगणाऱ्या पिढ्या शिवरायांच्या पश्चात इथे निर्माण झाल्या.
अशा झुंजार वृत्तीच्या मावळ्यांनीच औरंगजेबाचे आक्रमण परतवून लावले. छत्रपती संभाजीराजांच्या हौतात्म्याने मराठी माणसाला प्रेरणा दिली , इथल्या गवताला भाले फुटले , मनगटांची पोलादी कडी झाली आणि मुघलांना विजय दुरापास्त झाला.
यावेळी पवार यांनी महाशिवरात्रीच्या मुहुर्तावर प्रतापराव गुजर आणि त्यांच्या सवंगड्यांनी नेसरीच्या खिंडीत बहलोलखानाच्या सेनासागरात दिलेल्या प्राणाहुतीचा इतिहास सांगून स्वराज्यासाठी सर्वस्वाची होळी करणाऱ्या मावळ्यांनी स्वातंत्र्याची अमरगाथा रचल्याचे अभिमानपूर्वक सांगितले.
प्रारंभी माजी सभापती भारत मासाळ सर व मारुती जाधव यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करुन आरती करण्यात आली त्याबरोबरच भगव्या ध्वजाच्या नेतृत्वाखाली मुख्य रस्त्यावरुन मूक पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर छत्रपती संभाजीराजांच्या पुतळ्याचे पूजन कुंडलिक गणपाटील, बापूराव जाधव ,अनुप सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. ध्येयमंत्राचे पठण निखिल कुलकर्णी यांनी तर प्रेरणामंत्राचे पठण पराग रोंगे यांनी केले.
सूत्रसंचलन अजिंक्य माने यांनी केले तर आभार गणेश जगताप यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजय घुले, विजय पवार , समाधान ऐवळे, दत्तात्रय मासाळ , सुनिल शिंदे , बाळासाहेब कदम , अमीर मणेरी, दिलीप गायकवाड , प्रकाश बनसोडे , दादासाहेब भगरे , सचिन सरडे यांनी परिश्रम घेतले . यावेळी गावातील शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज