टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश गाव कोरोनाच्या संकटासोबत दोन हात करत आहेत. गाव पातळीवरील निर्णय घेण्यासाठी सदस्य आहेत परंतु सरपंच नाहीत, अशी स्थिती सोलापूर जिल्ह्यातील 15 गावांमध्ये निर्माण झाली आहे. गाव कारभाऱ्याशिवाय गावातील कोरोनाची लढाई ही गावे लढत आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील साडेसहाशे ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारी रोजी मतदान झाले व 18 जानेवारीला या निवडणुकीचा निकाल लागला.सरपंच आरक्षण सोडतीत या 15 गावांचे सरपंच आरक्षण झाले खरे; परंतु गावात ज्या प्रवर्गाचा सदस्यच नाही ते सरपंच आरक्षण मिळाले.
15 गावांमध्ये सरपंच पदाच्या आरक्षणाचा उमेदवारच नसल्याने या 15 गावांची सरपंच निवड रखडली आहे. गावात सरपंच पदाच्या आरक्षणाचा सदस्य नसल्यास त्या गावचे फेर आरक्षण काढण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. सरपंच निवडीच्या सभेनंतर तीस दिवसांमध्ये फेर आरक्षण काढावे, असा नियम आहे.
फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यात सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिक गडद झाले. कोरोनाला रोखण्यासाठी कडक निर्बंध आणि लॉकडाउन जाहीर झाला. त्यामुळे या 15 गावांच्या सरपंच पदाची फेर आरक्षण प्रक्रिया रखडली आहे. माळशिरस पंचायत समितीच्या उपसभापती निवडीची प्रक्रिया होऊ शकते मग या 15 गावाची फेर आरक्षण प्रक्रिया का होऊ शकत नाही, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.
‘या’ 15 गावांना नाही सरपंच
फेआरक्षणाच्या प्रतीक्षेत असलेली 15 गावे सांगोला तालुक्यातील आगलावेवाडी, बुरंगेवाडी, बोपसेवाडी, खिलारवाडी, निजामपुर, हनमंतगाव, तरंगेवाडी, बार्शी तालुक्यातील जहानपूर, उत्तर सोलापूर तालुक्यातील खेड, मोहोळ तालुक्यातील बोपले, पंढरपूर तालुक्यातील शेंडगेवाडी,
मंगळवेढा तालुक्यातील गणेशवाडी, दक्षिण सोलापूर तालुक्यातील राजूर व टाकळी आणि माळशिरस तालुक्यातील येळीव ही पंधरा गावे सरपंच पदाच्या फेर आरक्षणाच्या प्रतीक्षेत आहेत.(सकाळ)
कोरोनाची स्थिती पाहून निर्णय घेणार
या विषयासंदर्भातील फाईल माझ्याकडे आली आहे. या गावांमधील कोरोनाची स्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. लॉकडाउन असल्याने हा विषय प्रलंबित राहिला आहे.- मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी, सोलापूर
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज