मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । सोलापूर येथील शास्त्रीनगर परिसरातील एका घरात वृद्ध पती-पत्नीचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. या दांपत्याचा मुलगा गतिमंद आहे. “तो’ तीन दिवसांपासून “अम्मी मर गयी’ असे सांगत होता, मात्र त्याकडे कोणी लक्ष दिले नाही. एका सद्गृहस्थाने त्या घरात जाऊन पाहिल्यावर पती-पत्नी मरून पडल्याचे निदर्शनास आले. मरण पावलेल्या घटनेचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला.याबाबत सदर बझार पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
लॉकडाउनच्या काळात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्या वाढत असलेल्या प्रतिबंधित अशा शास्त्रीनगर भागात हा प्रकार घडला आहे. प्रतिबंधित क्षेत्रामुळे घराबाहेर न पडता आल्याने मरण पावलेल्या या दांपत्याच्या मृत्यूबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हसीना अब्दुलगनी शिलेदार (वय 60) आणि अब्दुलगनी शिलेदार (वय 65) असे मरण पावलेल्या पती-पत्नीचे नाव आहे.
सोलापुरातील शास्त्रीनगर मोहल्ला. झोपडपट्टीसदृश, दाट लोकवस्तीचा भाग. या ठिकाणी शिलेदार पती-पत्नी आपल्या मुलासह रहात होते. अब्दुलगनी शिलेदार सेवानिवृत्त कर्मचारी असल्याचे सांगण्यात आले. त्यांचा मुलगा गतिमंद आहे. त्याची माहिती या परिसरात सर्वांना आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वी तो गल्लीतल्या लोकांना “अम्मी मर गयी’ असे सांगत होता, रडतही होता. मात्र, त्याच्या बोलण्याकडे कोणी लक्ष दिले नाही. लोकांचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता.
शिलेदार दांपत्य वृद्ध असल्याने व त्यांचा मुलगा गतिमंद असल्याने त्यांच्या नातेवाइकांकडून दररोज त्यांना जेवणासाठी डबा येत होता. परंतु सध्या कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे शास्त्रीनगर परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. यामुळे त्यांना डबा पोच करण्यात अडचणी आल्या. आधीच वृद्ध, त्यात डबा न मिळाल्याने दोघांच्या झालेल्या मृत्यूबाबत संशयास्पद चर्चा सुरू झाली आहे. मृत वृद्ध दांपत्याचे रोजगार लॉकडाउनमुळे थांबले होते. त्यांचा दूरचा नातलग त्यांना डबा पोचवत होता. पण शास्त्रीनगर प्रतिबंधित क्षेत्र असल्यामुळे तो डबा देखील बंद झाला होता. काही दिवस त्या दोघांनी डब्याची वाट पाहिली. वृद्धावस्थेमुळे त्या दांपत्याला घराबाहेर येता आले नाही.
वृद्ध महिला मरण पावल्यानंतर त्यांचा मुलगा दोन दिवस मृतदेहाजवळ बसूनच होता. त्याला समजलेच नाही. नंतर त्याचे वडील मरण पावले. दरम्यान, “त्या’ मुलाने मोहल्ल्यात जाऊन “अम्मी मर गयी’ असे अनेकांना सांगण्याचा प्रयत्न केला. कोणीही ऐकले नाही. दोन दिवसांनंतर हळूहळू दुर्गंधी पसरू लागली तेव्हा त्याच परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने त्या घरात जाऊन पाहिल्यावर त्या मुलाचे आई-वडील दोघेही मरण पावल्याचे दिसून आल्याचे सदर बझार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बजरंग साळुंके यांनी सांगितले. (सकाळ)
शिलेदार पती-पत्नीच्या मृत्यूच्या घटनेची माहिती अधिकाऱ्यांकडून घेण्यात येईल. शासनाने विविध योजनांतून गरिबांपर्यंत धान्य पोचविण्याचे नियोजन केले होते. तरीही हा प्रकार कसा झाला याची चौकशी करण्यात येईल.
– मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज