टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विविध विकास प्रकल्प राबवले जात आहेत. त्यासाठी 424 कोटी रुपयांचा आराखडा आखण्यात आला आहे. सर्वांगीण विकासासोबतच जिल्ह्याला कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. Solapur rural Corona infection can be prevented : Guardian Minister
कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांच्यासह लोकप्रतिनिधी, कोरोना योेद्ध्ये, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
भरणे म्हणाले, सोलापूर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि सोलापूर महानगरपालिका यांच्या माध्यमातून व्यापक प्रयत्न सुरू आहेत. सोलापूर शहरातील कोरोनाचा संसर्ग आणि मृत्यूचा दर कमी करण्यात यश आले असून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही याचप्रमाणे यश येईल. कोरोना विषाणूच्या मुकाबल्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून भरीव निधीची तरतूद केली असून राज्य स्तरावरुनही भरघोस निधी दिला जाईल.
जिल्ह्यातील आरोग्याच्या पायाभूत सुविधा अधिक मजबूत होण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे बळकटीकरण करण्यावर भर देण्यात येईल. खास महिला आणि मुलांसाठीच्या स्वतंत्र रुग्णालयाची उभारणी लवकरच पूर्ण करण्यात येईल. साथरोग नियंत्रण रुग्णालय सुरू केले जाणार असून उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मनुष्यबळ आणि औषधांचा तुटवडा भासू नये, यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे, असेही त्यांनी नमूद केले.
सोलापूर जिल्हा शेतीवर अवलंबून आहे. कृषी औद्योगिक जिल्हा म्हणून ओळख अधिक दृढ होण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. यंदा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने पेरणीखालील क्षेत्र वाढले आहे. ही बाब अतिशय समाधानाची आहे. शेतकर्यांनी प्रधानमंत्री विमा योजनेस चांगला प्रतिसाद दिला आहे. शेती आणि शेतकरी सक्षम व्हावे, यासाठी उन्नत शेती, समृद्ध शेतकरी, कृषी यांत्रिकीकरण, गट शेतीस प्रोत्साहन, मागेल त्याला शेततळे या योजनांना चांगले यश मिळत आहे, असे ते म्हणाले.
जिल्ह्यातील रस्ते विकासाचे काम प्राधान्याने हाती घेण्यात आले आहे. पालखी मार्गांना महामार्गाचा दर्जा देण्यात आला असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने या रस्त्यांची कामे सुरू आहेत. या कामांसाठीचे भूसंपादन गतीने करण्यात आले आहे. भूसंपादनापोटी शेतकर्यांना सुमारे दोन हजार कोटी रुपयांची भरपाई देण्यात आली असून गावांतील वाहतूक सुरळीत होण्यासाठी पालकमंत्री पाणंद रस्ते योजना प्रभावीरीत्या राबवली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रशासकीय कामकाजात माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होत असून शेतकर्यांना संगणकीकृत सातबारा उतारे दिले जात आहेत. स्वामित्व योजनेंतर्गत गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी करण्यासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील दहा गावांची निवड करण्यात आली आहे. शेतकर्यांना जमिनींचे उतारे झटपट मिळण्यासाठी राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत सातबारा उतार्यांसोबत 8/अ उतारार्यांचेही संगणकीकरणाचे काम सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.
वनक्षेत्र वाढविण्यासाठी यंदा सुमारे अडीचशे हेक्टर क्षेत्रावर पावणेतीन लाख रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. वृक्ष लागवडीच्या या मोहिमेत नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून विकासात योगदान देण्याचे आवाहनही भरणे यांनी केले. यावेळी महसूल, पोलिस, जिल्हा परिषद, सार्वजनिक आरोग्य, महानगरपालिका यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज