टीम मंगळवेढा टाईम्स ।
कोरोनाने पालक गमावलेल्या बालकांना बालकांच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) प्रवेश प्रक्रियेंतर्गत राखीव जागांवर प्रवेश देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यातून सोलापूर जिल्ह्यातील एक हजारांहून अधिक बालकांना फायदा मिळणार आहे.
बालकांच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी शाळांमध्ये २५ टक्केच्या राखीव जागांवरील प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया १ मार्चपासून सुरू झाली आहे. ही प्रवेश प्रक्रिया १७ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.
मुदतीनंतर कुठल्याही अर्जाची दखल घेतली जाणार नसल्याच्या सक्त सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत.
दुर्बल वंचित घटकातील बालकांना शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. या जागांवरील प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण विभागातर्फे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
संकेतस्थळावर अर्ज भरता येणार आहे. शिक्षण विभागाने ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी नव्याने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार कोरोना काळात म्हणजे १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत दोन्ही पालक अथवा आई किंवा वडील गमावलेल्या बालकांना यंदा या प्रवेश प्रक्रियेंतर्गत मोफत प्रवेश दिला जाणार आहे.
दरम्यान, आरटीई प्रवेशासाठी जन्माचा दाखला, पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयंनिवेदन, निवासी पुरावा, रेशनकार्ड, वाहन परवाना, घरपट्टी पावती, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र,
सामाजिक वंचित जात संवर्गातील बालक असल्यास वडिलांचा अथवा बालकांचा जातीचा दाखला, आर्थिकदृष्ट्या दुर्बल संवर्गातून प्रवेशासाठी वार्षिक उत्पन्नाचा दाखला, दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र लागणार आहेत.
अशी आहे वयोमर्यादा
बालकांचा शिक्षण हक्क कायद्यांतर्गत मुलांना पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षण मोफत दिले जाते. त्यानुसार ३१ डिसेंबर २०२३ रोजीचे किमान वय ६ वर्षे किंवा कमाल वय ७ वर्षे ५ महिने ३० दिवस बालकांचे वय असणे अपेक्षित आहे.(स्रोत:पुण्यनगरी)
एकही बालक वंचित राहू नये
बालकांच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत अर्ज करताना पालकांनी पाल्यांचा परिपूर्ण अर्ज दिलेल्या मुदतीत सादर करावा. अर्ज करताना अचूक व खरी माहिती द्यावी. आरटीई अंतर्गत २५ टक्के अंतर्गत एखाद्या शाळेत प्रवेश घेतल्यास त्या बालकाला पुन्हा अर्ज करता येणार नाही.
आर्थिक वर्षात १ लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या पालकांच्या बालकांचा आर्थिक दुर्बल गटांमध्ये समावेश होतो. २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी १० शाळांची निवड करावी, ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी शिक्षण विभागाने १७ मार्चपर्यंत मुदत दिली असून त्यानंतर सोडत काढण्यात येईल. पालकांनी पाल्यांचा मुदतीत अर्ज भरणे बंधनकारक आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शीपणे राबवली जाईल.
शिवाय कोरोनात पालक गमावलेला एकही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठीची विशेष काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत.- दीपक केसरकर, शालेय शिक्षण मंत्री, महाराष्ट्र
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज