मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोना व्हायरसचे देशात तसेच राज्यातील अनेक जिल्हयात रुग्ण आढळून येत असून या पार्श्वभूमीवर पुढील महिन्यात भरणार्या पंढरपूर येथील चैत्री यात्रेबाबत शासनाची भूमिका काय हे स्पष्ट करावे अशी मागणी आमदार प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. ऐनवेळी यात्रा रद्द केल्यास याचा व्यापार्यांसह वारकरी भाविकांना देखील त्रास सहन करावा लागेल. यावर मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय बैठक घेवून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणीची चैत्रयात्रा दि.4 एप्रिल 2020 रोजी संपन्न होणार आहे. परंतू सध्या महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेली आहे. या कोरोना व्हायरसचे संशयित रूग्ण पुणे,मुंबई, नागपूर, नाशिक, अहमदनगर,बीड या जिल्हयामध्ये आढळून आलेेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातून व इतर राज्यातून तसेच ग्रामीण व दुर्गम भागातून भाविक या यात्रेमध्ये खूप मोठया प्रमाणात अंदाजे 4 ते 5 लाख भाविक यात्रेमध्ये सहभागी होत असतात.या यात्रेनिमित्त शासनामार्फत जादा बसेस,ट्रेन याची व्यवस्था केली जाते. तसेच या यात्रेसाठी पंढरपूर शहरातील व्यापारी हे विविध वस्तूंची व प्रसादाची विक्री मोठया प्रमाणात करतात.
साधारणत वारीच्या अगोदर एक महिन्याचा कालावधी असताना व्यापारी माल तयार करीत असतात व विविध वस्तू खरेदी करत असतात. जर शासनाने ऐनवेळी यात्रा न भरण्याचा आदेश काढला तर व्यापार्यांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान होईल.त्यामुळे शासनाने याबाबत चेत्रयात्रेबाबत निर्णय घेण्याची मागणी आ. प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
तसेच वारकर्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव वारीकाळात खूप मोठया प्रमाणात पंढरपूर शहरात इतर जिल्हयातील पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येत असतो. आरोग्याच्यादृष्टीनेही स्थानिक प्रशासनाकडून वारकरी भाविक व पेालिस प्रशासनाची काळजी घेतली जाते. त्यामुळे 4/4/2020 रोजी होणार्या चैत्र यात्रेसाठी 4 ते 5 लाख भाविक येणार असल्याने त्यांना कोरोना व्हायरसची लागण होवू नये यासाठी यात्रा कालावधीमध्ये कशा प्रकारे कोरोना व्हायरसचा सामना केला जाणार आहे याबाबत जनतेला आवाहन करावे. सध्या महाराष्ट्रातील अनेक वर्तमानपत्रामध्ये राज्यातील यात्रा व जत्रा रद्द केल्याचे वाचण्यात आलेले आहे.
त्याधर्तीवर पंढरपूर येथील चैत्रवारी भरणार आहे किंवा नाही याबाबतचे लेखीपत्राव्दारे व अधिवेशनामध्ये विचारणा केली असता मुख्यमंत्री यांनी लवकरात लवकर उच्चस्तरीय बैठक घेवून निर्णय घेतला जाईल असे आश्वाासन दिले असल्याची माहिती आ.प्रशांत परिचारक यांनी दिली.
तसेच पंढरपूर येथील चैत्र यात्रा भरणेबाबत वारकरी सांप्रदायातील लोकांशी चर्चा व्हावी सदर यात्रेसाठी महाराष्ट्राबरोबरच शेजारील कर्नाटक राज्यामधूनही अनेक भाविक या यात्रेसाठी पंढरपूरमध्ये येत असतात. त्या राज्यासही यात्रेबाबत निर्णय अवगत करावा. सदर यात्रा भरणार असेल तर लवकरात लवकर तसे महाराष्ट्रातील व शेजारील कर्नाटक राज्यातील जनतेस आवाहन करण्यात यावे अशी मागणी आ.प्रशांत परिचारक यांनी केले.
जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज