टीम मंगळवेढा टाईम्स।
मरवडे ता.मंगळवेढा येथील सरपंचपदाची निवडणूक बेकायदेशीररीत्या तहकूब करणाऱ्या अध्यासी अधिकारी चंद्रकांत घाडगे व त्यांना चुकीचा आदेश देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी ग्रामपंचायतीच्या सहा सदस्यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे केली.
एक वर्षापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील सरपंच सहित पाच सदस्यांनी आपला निवडणूक खर्चाचा हिशोब दिला नसल्याच्या कारणावरून केलेल्या तक्रारीनुसार
जिल्हाधिकाऱ्यांनी 5 जणांना अपात्र ठरवले तत्पूर्वी सरपंचांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे त्या रिक्त पदासाठी
मा.जिल्हाधिकारीसो सोलापूर यांचेकडील आदेश क्र . सा.वि./ग्रा.पं /3 /स.न. /07/2022 दि.14 फेब्रुवारी 22 नुसार मरवडे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवडणूक प्रक्रीया काल दि.25 रोजी पूर्ण करण्याबाबतची सूचना काढण्यात आली.
दरम्यान अपात्र पाच सदस्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे दाद मागितली असता राज्य निवडणूक आयोगाने त्यांना मतदानासाठी पात्र ठरवले व जिल्हाधिकार्यांच्या आदेशाला स्थगिती दिली हा निर्णय परवा रात्री उशिरा प्राप्त झाला.
दरम्यान काल सकाळी 10 वाजल्यापासून निर्देशित केलेले सर्वच्या सर्व 7 सदस्य सभेच्या ठिकाणी हजर होते. सरपंच पदाच्या निवडीसाठी 100 % गणपूर्ती झाली असल्याने सरपंच पदासाठी
अर्ज भरण्यास इच्छुक असून नामनिर्देशनपत्र उपलब्ध करुन द्यावेत अशी अनेकदा मागणी करुन देखील ही सभा राजकीय दबावापोटी चुकीच्या पद्धतीने तहकूब करण्यात आल्याचे ग्रामपंचायत सदस्य अशोक जाधव यांनी सांगितले.
मात्र सदरची प्रक्रिया मा.तहसिलदारसो यांच्या आदेशाने तहकूब केल्याचे तोंडी सांगून बेकायदेशीर पद्धतीने सभा तहकूब केलेली आहे.
वास्तविक मा.जिल्हाधिकारीसो यांच्या आदेशाने काढण्यात आलेली सभा तहकूब करण्याचा अधिकार कनिष्ठ अधिकाऱ्यांना नसतो हे ठाऊक असूनही चुकीच्या पद्धतीने ही सभा तहकूब करण्यात आली.
त्यामुळे आम्हांला सरपंच पदाची मिळालेली संधी निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रकांत घाडगे यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे हिरावून घेतल्याचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्याकडे दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे .
याशिवाय ग्रामपंचायत अधिनियम मधील 22 डिसेंबर 1997 मधील मुद्दा क्र 12 नुसार सरपंच निवडीची तहकूब झालेली सभा दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी , त्याचवेळी घेण्याचे निर्देश आहेत.
त्यानुसार सदरची तहकूब सभा त्वरीत उद्या दि.26 फेब्रुवारी रोजी घेण्यात यावी अशीही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.
या निवेदनावर ग्रामपंचयत सदस्य अशोक जाधव ,संजय पवार ,आनंदाबाई पोतदार, नसिमबानू मुजावर,दिपाली ऐवळे ,मालन मणेरी इ. ग्रामपंचायत सदस्यांच्या स्वाक्षरी आहेत.(स्रोत:सकाळ)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज