मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
सरकारने शासकीय कामकाजाचा पाच दिवसांचा आठवडा केल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असताना पोलीस दलातून मात्र ‘आम्हाला साप्ताहिक सुटीही नियमित मिळत नाही’ अशी खंत व्यक्त केली जात आहे.
त्यावर पर्याय म्हणून ‘इन्टेलिजन्स’च्या धर्तीवर एक महिन्याचा अतिरिक्त पगार अर्थात १३ महिन्यांचा पगार ही मागणी पुढे येत आहे.
अत्यावश्यक सेवा म्हणून पोलीस दलाला पाच दिवसांचा आठवडा लागू केला जाणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. त्या पार्श्वभूमीवर कोणतीही संघटना नसलेल्या पोलिसांनी खासगीत आपल्या व्यथा मांडल्या आहेत. पोलिसांच्या हक्कासाठी लढणाऱ्या संघटनेच्या माध्यमातून त्यांच्या व्यथा व मागण्या गृहमंत्रालयापर्यंत पोहोचविल्या जाणार आहेत.
सुट्या कमी मिळत असल्याने केंद्र शासन ‘इन्टेलिजन्स ब्युरो’च्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना १३ महिन्यांचा पगार देते. हाच पॅटर्न आता केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनाही लागू करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर आता महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही अतिरिक्त कामाचा मोबदला म्हणून वर्षाला १२ ऐवजी १३ महिन्यांचा पगार देण्याची मागणी पुढे आली आहे.
————–
मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज