भिमराव मोरे सर / 9890111227
मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । धार्मिकतेचे आणि अध्यात्मिकतेचे नगरी म्हणून ओळखल्या जाणार्या या संतांच्या नगरीमध्ये पुराण काळापासून धार्मिकतेबरोबरच राजकीय महत्व आहे. या नगरीमध्ये अनेक राजे राजवाडयांनी मराठे सुलतानी पेशव्यांनी या नगरावर आपले अधिराज्य प्रस्थापित केले. तरी देखील या धार्मिक नगरीचे संतांची पुण्यनगरी म्हणून आजही ओळख आहे. अनेक संतांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या या नगरीमध्ये प्राचीन काळापासून आजपर्यंत या नगराचे धार्मिक अधिष्ठान अबाधित आहे.
संतशिरोमणी दामाजीपंत, विठ्ठल भक्त चोखोबा, शिलवंती कान्होपात्रा, गोपाबाई, मोहिनीबुवा, स्वामी समर्थ, महात्मा बसवेश्वर, काशीविश्वेश्वर, लतिफबुवा, गोविंदबुवा आणि मंगळवेढयाची ग्रामदैवत गैबीपीर या सर्वांच्या कार्यकर्तृत्वाने आणि पदस्पर्शाने पुनित झालेल्या या नगराला मंगळवेढा हे नाव प्राचीन काळापासून दिले गेले. या पुण्य धार्मिक नगराला काबीज करण्यासाठी मंगळ राजाने स्वारी केली होती. असा इतिहास आहे. परंतु शहराभोवती चिरेबंद तटबंदी असल्याने बरीच वर्षे मंगळ राजाला हे नगर ताब्यात घेता आले नाही. शेवटी राजाने या नगराभोवती कडेकोट वेढा देवून नगरात येणारी रसद बंद केली आणि या शहरवासियांना शेवटी मंगळ राजाला शरण यावे लागले आणि मंगळ राजाने या शहरावर आपली सत्ता प्रस्थापित केली. त्यांच्या नावाने या शहराला मंगळवेढा असे नाव दिले.
प्राचीन काळापासून मंगळवेढा दुष्काळाच्या खाईत शेकडो वेळा लोटले गेले आहे. याचाच एक दाखला म्हणून बाराव्या शतकात दामाजीपंतांनी दुष्काळग्रस्त जनतेसाठी धान्याची कोठारे खुली केल्याचा इतिहास सर्वपरिचित आहे. शेकडो वेळा दुष्काळातून होरपळलेल्या मंगळवेढा नगरीच्या जनतेला पांडुरंगाच्या कृपाप्रसादाने बाहेर काढल्याचे दाखले आहेत. त्यामुळे ज्या ज्या वेळी दुष्काळ पडला त्या त्या वेळी मंगळवेढेकरांना पांडुरंग भक्त संत शिरोमणी दामाजीपंतांची आठवण झाली. आज 800 वर्षानंतर दुष्काळाच्या खाईत सापडलेला मंगळवेढा सावरतो न सावरतो तोच सर्व मंगळवेढेकरांना जागतिक संकट मानल्या जाणार्या कोरोना रोगाचा प्रसार होतो आहे. या रोगापासून संरक्षित होण्यासाठी शासनाने केवळ जनतेलाच क्वारंटाईन केले नसून दामाजीपंतांना देखील गेल्या दोन महिन्यापासून क्वारंटाईन्ड केलेले आहे.
त्यामुळे गेल्या अनेक महाभयानक दुष्काळापेक्षा देखील यावर्षीचा कोरोना सर्वांनाच महाभयानक वाटतो आहे. यातून सावरण्यासाठी दामाजीपंतांच्या कृपाशिर्वादाने मंगळवेढा कोरोनापासून आज देखील सुरक्षित आहे.यामुळेच दामाजीपंताच्या आशीर्वादाने मंगळवेढयातील जनता संसर्गापासून अलिप्त आहे. यासाठी धार्मिक अधिष्ठान म्हणून दामाजी संस्थेचे अध्यक्ष विष्णूपंत आवताडे, सचिव आनंदराव जावळे व संस्थेचे विश्वस्त दररोज धार्मिक विधी सकाळ संध्याकाळ नित्यनेमाने करीत आहेत. आज दामाजीपंतांची पुण्यतिथी आहे. या पुण्यतिथीच्या निमित्ताने पंढरीचा पांडुरंग दामाजीला मदत करण्यासाठी आल्यानंतर समस्त मंगळवेढा शहर व ग्रामीण जनतेला कोरोनातून मुक्त होण्याचा आशीर्वाद देणार आहे हे निश्चित!
भागवत धर्माची पुण्य पताका फडकवित ठेवण्यासाठी दामाजी संस्थेच्या माध्यमातून वर्षभर अखंडीत हरिनामाचा गजर आणि टार, मृदंग व भजन हरीनामाने दिव्यज्योत तेवत ठेवण्याचे काम दामाजीपंतापासून ते विष्णूपंतापर्यंत हा हरिनामाचा गजर पहाटेच्या काकडआरतीपासून ते रात्रीच्या भजन प्रसादापर्यंत हरिपाठ, आरती, अन्नछत्राचे मिष्टापन्न भोजन चालू ठेवण्यासाठी दामाजी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष विष्णुपंत आवताडे, शंकर हजारे, नाना आवताडे पासून ते बुवा जगताप पर्यंत वसंतराव करंदीकरांपासून ते आनंदराव जावळेपर्यंत, दामाजी पंतांच्या पवित्र स्थळी अविरत कष्ट घेत आहेत.
या मंदिरामध्ये दरवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून ते फाल्गुन वद्य एकनाथ षष्ठीपर्यंत बारा महिने अखंडीत पुण्यतिथी जन्मोत्सव, हरिपाठ, ग्रंथवाचन साजरे केले जातात. चैत्र महिन्यातील उटीचा कार्यक्रम महिनाभर चालत असून महिला पुरूष भजनासाठी दिवसभर आपली हजेरी लावतात.
चैत्र महिन्यात राम जन्मोत्सव, हनुमान जयंती, गोरोबा कुंभार पुण्यतिथी साजरी झाल्यानंतर वैशाख महिन्यात मंगळवेढेकरासाठी धार्मिक पर्वणीचा हा महिना दामाजीपंतांच्या पुण्यसोहळयासाठी वैशाख शुद्ध बारसीपासून ते आज वैशाख शुद्ध पौर्णिमेपर्यंत चार दिवस हा सोहळा संपन्न होतो. या सोहळयात विना उभारण्याची सुरूवात गेल्या चार पिढयापुर्वी पंढरपूर तालुक्यातील रांझणी गावच्या आवताडे कुटूंबियांनी दामाजी मंदिरामध्ये सुरूवात केली. आजही या विण्याचा मान त्यांनाच दिला जातो. या चार दिवसात अहोरात्र भजन, भारूड, प्रवचन, किर्तन असा भरगच्च कार्यक्रम होत असतो. या सोहळयाची सांगता दरवर्षी दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या महाप्रसादाने होते. या कारखान्याचे तत्कालीन चेअरमन चरणूकाका पाटील यांनी या महाप्रसादाची जबाबदारी गेल्या वीस वर्षापुर्वी घेवून दामाजीपंताच्या पुतळयाला दररोज ताजा फुलाचा हार घालण्याची प्रथा आजही चालू आहे.
मंगळवेढयाचा दामाजी आषाढ महिन्यात आपली पालखी घेवून विठ्ठल भेटीला आषाढी एकादशी दिवशी जाण्याची प्रथा गेल्या तीन पिढयापासून मंगळवेढेकर गेल्या तीन पिढयापासून जपत आहेत. आषाढ शुद्ध सप्तमीच्या दिवशी ह.भ.प.पांडुरंग माळी यांच्या दुसर्या पिढीतील सिद्धेश्वर माळी आणि आज तिसर्या पिढीतील बजरंग माळी हे शनिवार पेठेतील माळयाच्या वाडयातून दामाजीपंताची पालखी एकलासपूर, वाखरी मार्गे पंढरपूरला जाते. दामाजीपंताचा मानाचा कट्टा असून माऊलीच्या पालखीमध्ये दहाव्या नंबरचा पालखीचा मान दामाजीपंताच्या पालखीचा आहे. ज्या संत ज्ञानेश्वर माऊलींनी भागवत धर्माचा पाया रचला त्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजाच्या पालखी सोहळयामध्ये दामाजीपंताच्या पालखीला मानाचे स्थान आहे. म्हणूनच गेली अनेक पिढयापासून ज्ञानेश्वर महाराजांचा पारायण सोहळा मंगळवेढयाच्या दामाजी मंदिरामध्ये सात दिवस साजरा केला जातो. या पारायण सोहळयास मंगळवेढा शहर व परिसरातील सुमारे चारशे लोक पहाटे पाच वाजता ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाचन करतात.
या पारायणकर्त्यांना पाचशे ज्ञानेश्वरी ग्रंथ ठेवण्यासाठी पाचशे सुबक सुंदर लाकडी पाट दामाजी संस्थेने देवू केलेले आहेत. त्यामुळे या पारायण सोहळयाचा उत्सव मोठया प्रमाणामध्ये मंदिरात साजरा होतो.
कर्नाटकातील राजा रामदेवराय राजाने विठ्ठल भक्तीने विठ्ठलाला साकडे घालून नवव्या शतकामध्ये विठ्ठल कर्नाटकामध्ये हंपी या ठिकाणी काही काळ नेल्याची अख्यायिका आहे. रामदेवराय राजाने आपल्या भक्तीने विठ्ठलाला कर्नाटकात नेले. तेव्हापासून त्यांना कर्नाटकु विठ्ठल म्हणतात. परंतु माझ्या महाराष्ट्रातील भक्तांचा अपमान न करण्याच्या बोलीवर राजा रामदेवरायानी बांधलेल्या सुंदर मंदिरामध्ये विठ्ठल राहिले देखील परंतु एकनाथ महाराजांचे आजोबा भानुदास महाराज कर्नाटकात गेलेल्या विठ्ठलाला आणण्यासाठी गेले असता त्यांच्यावर चोरीचा खोटा आरोप झाला. हे विठ्ठलाला मान्य न झाल्याने मी कर्नाटकात राहणार नाही असे राजे रामदेवरायाला सांगून ही सावळी विठ्ठल मुर्ती भानुदास महाराजांनी पायी चालत पंढरपूरला आणत असताना एक दिवस मंगळवेढयात आवताडे सॉ मिल च्या शेजारी असलेल्या विठ्ठल मंदिरामध्ये एक दिवस मुक्काम असल्याचा पुरावा आहे. या विठ्ठल मंदिरातील विठ्ठलाची मुर्ती एवढी सुबक आणि सुंदर आहे की महाराष्ट्रातच नव्हे तर देशात कुठेही एवढे देखणे सावळे रूप असलेली सुबक मुर्ती विठ्ठलरूप इतरत्र आढळत नाही. हे मात्र सत्य. या विठ्ठल मंदिराच्या जिर्णोद्धाराची जबाबदारी समस्त मंगळवेढेकरांची असून हे मंदिर आज दुरावस्थेत असल्याचे दिसून येते. कर्नाटकातील चाळीस हजार वारकरी दरवर्षी दामाजी मंदिरात एक दिवसाचा मुक्काम करून पायी पंढरपूरला जातात. मात्र हे दुरावस्थेत असलेले विठ्ठल मंदिर मंगळवेढेकरांकडून दुर्लक्षित आहे.
वर्षभरातील धार्मिक, अध्यात्मिक परंपरेनुसार दामाजीमंदिरात अन्नछत्र त्याचबरोबर शेकडो लोक दररोज महाप्रसादाचा लाभ घेतात. परगावहून आलेले भक्त, पर्यटक, गावातील निराधार व गरीब अखंडपणे अन्नछत्रात हजेरी लावतात. गेल्या वीस वर्षापासून या अन्नछत्राची जबाबदारी दामाजी संस्थेने घेतलेली असून संस्थेचे विद्यमान अध्यक्ष विष्णूपंत आवताडे व त्यांच्या नियोजनाने हे अन्नछत्र दामाजीचा पुण्य वारसा अखंडपणे जपत आहेत. या अन्नछत्रासाठी अन्नदाते म्हणून आप्पासाहेब इंगळे, बलभिम इंगळे, विठ्ठल ताड, बाबा माळी, बीडचे अवगड, गेवराईचे कट्टे यांच्यापासून अन्नदात्यांची सुरूवात झाली असून दरवर्षी या अन्नछत्रासाठी मंगळवेढयाचे धनिक दामाजीमंदिरात धान्य आणून पोहचवितात. आपल्या शिवारामध्ये दामाजीच्या कृपेनेच धान्य पिकल्याचा ते विश्वास ठेवतात. या अन्नछत्रासाठी मंगळवेढयाच्या ज्वारीची कसदार भाकरी, दोन भाज्या, एक गोड पदार्थ असा पंचपक्वान्नी जेवण नित्यनेमाने वर्षभर चालत आहे. धार्मिक अधिष्ठान असलेल्या या पुण्यनगरीमध्ये सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत असून अनेक संकटे निसर्गाची अवकृपा, दुष्काळ, पूर या सर्व संकटातून मंगळवेढेकरांना धार्मिकतेतून मुक्ती मिळालेली आहे. आजच्या या कोरोनाच्या महासंकटातून मंगळवेढेकर निश्चित सुरक्षित राहतील. या महासंकटातून बाहेर पडण्यासाठी पांडुरंग व दामाजीचा आशीर्वाद मंगळवेढेकरांना लाभावा हीच पांडुरंग चरणी प्रार्थना ! –भिमराव मोरे सर,मंगळवेढा मो.9890111227
————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज