टीम मंगळवेढा टाईम्स।
राज्यातील वातावरणातसातत्याने बदल होत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आजपासून सहा मार्चपर्यंत राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सध्या द्राक्ष काढणीचा हंगाम चालू आहे. अशातच पाऊस जर झाला तर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे.
फळघडाचे नुकसान होऊन फंगसचे आक्रमण होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पावसाचा इतर पिकांनाही फटका बसण्याची शक्यता आहे.
देशाच्या वायव्य दिशेकडून बंगालच्या उपसागरात सागराहून वारे वाहत आहेत. तसेच अरबी समुद्रातून नैऋत्येकडून वायव्य भारताच्या दिशेने सरकणारे पण उत्तर महाराष्ट्राकडे वळणाऱ्या आर्द्रतायुक्त वाऱ्यांचा मिलाफ होण्याची शक्यता आहे.
त्यामुळेच या वातावरणीय घडामोडी घडण्याची शक्यता असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली. सध्या हवामान विभागाकडून चार ते आठ मार्चपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
प्रत्यक्षात सोमवार दिनांक 6 मार्च संध्याकाळपासून ते बुधवार दिनांक 8 मार्चपर्यंत नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, नाशिक, येवला, नांदगाव, दिंडोरी, कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा तसेच खान्देश, अहमदनगर, पुणे, सातारा, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, हिंगोली आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पाऊस किती होतो, त्यापेक्षा पाऊस कशा पद्धतीचा होतो, यावर शेतीपिकांचे नुकसान अवलंबून आहे. कारण पावसाबरोबर तूरळक ठिकाणी कदाचित गारपीट होण्याचीही शक्यता नाकारता येत नसल्याचे माणिकराव खुळे म्हणाले.
पाऊस जरी 2 ते 10 मिमी असला तरी त्याचबरोबर वाराही ताशी 20 ते 25 किमी वेगाचा असू शकतो. हा वाराच कदाचित जास्त फळबागा आणि रब्बी पिकांचे नुकसान करण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसापेक्षा ज्याला आपण वावधन म्हणतो त्या वाऱ्याचीच भीती एकंदरीत जास्त जाणवत असल्याचे खुळे म्हणाले.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भात सहा मार्च रोजी सर्वत्रच पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर पाच मार्च रोजी नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला आणि बुलढाण्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उत्तर कोकणात देखील पावसाची शक्यता कायम आहे. मात्र, अतिशय तुरळक पावसाचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून व्यक्त करण्यात आला आहे.
औरंगाबादेत देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातील कमाल तापमानात घट होण्याचं चित्र नाही. सरासरीपेक्षा दोन ते तीन अंश सेल्सिअसने तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.(स्त्रोत:ABP माझा)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज