मंगळवेढा टाइम्स वृत्तसेवा:-
शिक्षण विभागातर्फे ‘पवित्र’ संकेतस्थळाद्वारे राबवण्यात येत असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत खासगी शिक्षण संस्थांतील नववी ते बारावीसाठीच्या ८३८ उमेदवारांची विनामुलाखत निवड यादी जाहीर करण्यात आली. त्यामुळे आता उर्वरित पदांसाठीच्या भरतीची उमेदवारांना प्रतीक्षा आहे.
राज्यातील शाळांमध्ये शिक्षकांच्या रिक्त असलेल्या १२ हजार जागा भरण्यासाठी पवित्र संकेतस्थळाद्वारे प्रक्रिया सुरू करण्यात आली. आधी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता, न्यायालयीन प्रकरणांमुळे या भरती प्रक्रियेत बराच वेळ गेला. त्यानंतर सप्टेंबरमध्ये ५ हजार उमेदवारांची निवड यादी जाहीर करून त्यांना नियुक्ती देण्यात आली.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने भरती प्रक्रिया खोळंबली.
विनामुलाखत भरती प्रक्रियेसाठी तयार असलेल्या खासगी संस्थांतील रिक्त जागांसाठी ही पदभरती करण्यात आली आहे. आता उर्वरित जागा कधी भरल्या जाणार, याकडे राज्यभरातील पात्रताधारक उमेदवारांचे लक्ष लागले आहे.गणित-विज्ञान अशा काही विषयांसाठीच्या काही जागांबाबतचा निर्णय नंतर घेतला जाणार आहे. पहिली ते आठवीच्या माजी सैनिकांच्या जागा, तसेच आधीच्या निवड यादीत निवड होऊन उमेदवार रुजू न झाल्याने रिक्त राहिलेल्या अशा एकूण बाराशे ते पंधराशे जागांसाठीची फेरी घेतली जाईल. त्यानंतर मुलाखतीद्वारे भरल्या जाणाऱ्या तीन हजार जागांसाठीची फेरी होईल. ही संपूर्ण प्रक्रिया ३१ मार्चपूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.- विशाल सोळंकी, शिक्षण आयुक्त
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज