मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
राज्यभरातील वाड्या-वस्त्यांच्या नावातून जात हद्दपार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सामाजिक न्याय विभागाने घेतला आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील 21 गावांतील वाड्यांच्या नावामधून जात हद्दपार होणार आहे. या गावांचे भीमनगर, सिद्धार्थनगर, ज्योतीनगर, शाहूनगर असे नामकरण होण्याची शक्यता आहे.
सातारा जिल्ह्यात 1 हजार 739 गावे आहेत, तर 1 हजार 495 ग्रामपंचायती आहेत. जिल्ह्यातील काही गावासह वाड्या-वस्त्यांना चांभारवाडी, धनगरवाडी, रामोशीवाडी, लोहारवाडी, भुयाचीवाडी, गोसावेवाडी, गोसाव्याचीवाडी, महारवाडा, धनगरवाडा, बौद्धवाडा, ढोरवस्ती, मांगवाडा अशी नावे पूर्वीपासून दिली असल्याने ही गावे व वाड्या-वस्त्या जातीच्या नावाने ओळखल्या जात आहेत.
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र पुरस्कार देण्यात येत होता. या पुरस्कारातून दलित हा उल्लेख काढून टाकण्याचा निर्णय 2 एप्रिल 2012 रोजी शासनाने घेतला होता. त्याऐवजी समाजभूषण पुरस्कार असे नामकरण नमूद करण्यात आले होते. जिल्ह्यात फलटण तालुक्यात चांभारवाडी, माळवाडी, सातारा तालु्क्यात धनगरवाडी कोडोली, धनगरवाडी निगडी, माळ्याचीवाडी, माण तालुक्यात कासारवाडी, कोरेगाव तालुक्यात न्हावी बु., रामोशीवाडी, खटाव तालुक्यात गोसाव्याचीवाडी, कराड तालुक्यात लोहारवाडी, भुयाचीवाडी, गोसावेवाडी, वाण्याचीवाडी, माळवाडी, वाई तालु्क्यात लोहारे, जावली तालुक्यात कुंभारगणी, खंडाळा तालुक्यात धनगरवाडी, वाण्याचीवाडी, पाटण तालुक्यात सुतारवाडी, कुंभारगाव, मराठवाडी अशा 21 वाड्यांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जातीच्या नावाने ओळख असलेल्या गावांचा शासन लवकरच नामकरण सोहळा करणार आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज