मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । महाराष्ट्रात आतापर्यंत करोनाचा एकही संशयित रुग्ण आढळलेला नाही. मात्र कोरोना विषाणू संसर्गाची काळजी म्हणून सर्वसामान्यांनी प्रतिबंधासाठी मास्कऐवजी स्वच्छ धुतलेला रुमाल वापरावा, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी विधान परिषदेच्या माध्यमातून राज्यातील जनतेस केले.
जगभरात करोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण केवळ अडीच ते तीन टक्के असून या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. समाजमाध्यमांवर चुकीचे संदेश पसरविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश सायबर क्राइम शाखेला दिले आहेत. महाराष्ट्रात एकही संशयित रुग्ण आढळला नसून नागरिकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही.
यासंदर्भात विधान परिषदेत सदस्य प्रकाश गजभिये यांनी अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर तसेच शरद रणपिसे, हेमंत टकले, महादेव जानकर, भाई जगताप, प्रशांत परिचारक, अनिकेत तटकरे, डॉ. रणजित पाटील, भाई गिरकर, विनायक मेटे, जोगेंद्र कवाडे, श्रीमती मनीषा कायंदे, विद्या चव्हाण, हुस्नबानो खलिफे आदींनी चर्चेत भाग घेतला.
जवळपास तीन तास झालेल्या चर्चेच्या उत्तरात आरोग्यमंत्री श्री. टोपे म्हणाले की, राज्य शासनाने या विषाणूचा मुकाबला करण्यासाठी परिपूर्ण तयारी केली आहे. आतापर्यंत मुंबईत आलेल्या ५५१ आंतरराष्ट्रीय विमानातील ६५ हजार १२१ प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंग केले आहे. राज्यात बाधित देशातून ४०१ प्रवाशी आले असून आतापर्यंत १५२ प्रवाशांना विविध रुग्णालयांत भरती करण्यात आले होते. त्यांची दोन वेळेस प्रयोगशाळा चाचणी केली. त्यापैकी १४९ लोकांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. त्यापैकी १४३ जणांना घरी सोडले आहे. सध्या सहा जण दाखल असून पुणे येथे दोन जण नायडू आणि मंगेशकर रुग्णालयात निरीक्षणाखाली आहेत. मुंबई येथे चार जण कस्तुरबा आणि हिंदुजा रुग्णालयात दाखल आहेत.
मुंबई येथे कस्तुरबा, राजावाडी, कुर्ला, वांद्रे, बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर येथे विलगीकरण कक्षाची सुविधा करण्यात आली आहे. त्याचबरोबर सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये किमान दहा खाटांचे विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहेत. केंद्र शासनाच्या वतीने डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात येत असून ६ मार्चला त्याचे पहिले सत्र दिल्ली येथे होणार आहे. राज्यातील काही डॉक्टर्स त्यात सहभागी होणार असून त्यांच्या माध्यमातून राज्यातील अन्य डॉक्टरांना प्रशिक्षित केले जाईल. राज्यात पर्सनल प्रोटेक्शन किट, एन-९५ मास्क, ट्रिपल लेअर मास्क ही आवश्यक साधनसामग्री मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध असून त्याची कमतरता भासणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील सर्व बंदरांवर येणाऱ्या जहाजांमधील प्रवाशांचीदेखील तपासणी केली जात आहे. आतापर्यंत ३० जहाजांमधील ६७६ प्रवाशांची तपासणी केली त्यात संशयित रुग्ण आढळून आला नाही. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार चीनसह १२ देशांमधून येणाऱ्या विमानांतील प्रवाशांची तपासणी केली जात आहे. आता मात्र सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची थर्मल स्कॅनरद्वारे तपासणी केली जात असून प्रत्येकाला ‘स्वघोषणापत्र’ देणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रवाशाने कुठल्या देशातून प्रवास केला व कुठे जाणार आहे, संपर्क क्रमांक आदी माहिती देणे गरजेचे आहे. देशात सध्या केरळ, दिल्ली आणि तेलंगणा येथे अनुक्रमे तीन व प्रत्येकी एक असे पाच रुग्ण स्थानिक रुग्णालयांनी केलेल्या चाचणीनुसार पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. मात्र पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडून त्यांचा अहवाल येणे बाकी आहे.
कोरोनाची जागतिक स्तरावरील सद्य:स्थिती स्पष्ट करताना आरोग्यमंत्री म्हणाले, चीनमध्ये ८० हजार जणांना कोरोनाची बाधा झाली असून २ हजार ९१५ जणांचा मृत्यू झाला आहे. जपानमध्ये २८० जणांपैकी १२ जणांचा मृत्यू झाला असून इराणमध्ये १००० जणांना बाधा होऊन ६६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर इटलीमध्ये २००० जण बाधित असून ६२ जणांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण कोरियामध्ये बाधितांची संख्या ४३०० असून २६ जणांचा मृत्यू झाला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज