टीम मंगळवेढा टाईम्स ।
पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील प्रत्येक कुटुंबातील हजारो माता भगिनींशी बंधुत्वाचे नाते जोडणाऱ्या स्व.भारत भालके यांच्या निधनानंतर संपन्न होत असलेल्या पहिल्याच रक्षाबंधन निमित्त मरवडे येथील महिलांनी स्व.भालके यांच्या प्रतिमेचे पूजन करुन व राखी ठेवून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.यावेळी सर्वांना गहिवरुन आले.
रक्षाबंधन हा भाऊ -बहिणींच्या भावबंधनातील जिव्हाळ्याचा सण मानला जातो. हिच बाब विचारात घेऊन दोन्ही तालुक्यातील हजारो माय भगिनींशी स्व.भारत भालके यांनी बंधुत्वाचे नाते जोडले होते.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने गावागावांतील हजारो महिलांना एकत्र करुन अनेकदा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन केले होते. शिवाय माहेरच्या मायेने स्नेहभोजन व साडीचोळीचा आहेर करुन जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले होते. शिवाय सुख दुखाःच्या कार्यक्रमासाठी ते आवर्जून उपस्थित राहत असत.
याशिवाय लोकप्रतिनिधीच्या भूमिकेतून काम करताना महिलांच्या डोईवरील हंडा उतरवण्यासाठी त्यांनी भोसे पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली आहे. महिलांसाठी संरक्षक भूमिका,बचतगट सक्षमीकरण, आशा वर्कर व अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांना न्याय अशा अनेक अंगांनी काम केले होते.
शिवाय महाराष्ट्राची लोकपरंपरा जतन करुन ठेवणार्या वृद्ध कलावंतांना मानधन वाढ असे विषय मार्गी लावून महिला भगिनींना दिलासा दिला होता. त्यामुळे घराघरांतील माय भगिनींशी त्यांचेविषयी स्नेहमय आपुलकी निर्माण झाली होती.
गतवर्षी नोव्हेंबर मध्ये भालके यांचे अकाली निधन झालेनंतर दोन्ही तालुक्यातील महिलांना पाठीराखा भाऊ गेल्याचे दुःख झाले होते. त्यांच्या निधनानंतर संपन्न होणाऱ्या पहिल्या सणाला या आठवणींचा गहिवर दाटून आला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जनरल सेक्रेटरी संजय पवार यांच्या पुढाकाराने एकत्र आलेल्या मरवडे येथील महिला भगिनींनी स्व.भारतनाना यांच्या प्रतिमेचे श्रद्धेने पूजन करीत समोर राखी ठेवून आठणींना उजाळा दिला.
यावेळी माजी सरपंच ताई मासाळ, नंदाताई रोंगे ,जयश्री घुले,सारिका पवार, सुनिता बनसोडे, मालन मणेरी, प्रियंका पवार,सारिका मासाळ , कुमुदिनी चव्हाण, उषा शिवशरण, मनिषा पवार, भाग्यश्री मासाळ यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज