मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क।
विमा कंपनी तसेच विमा सल्लागार कंपनी यांचा असमाधानकारक कामाचा अनुभव, अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबाला अत्यंत उशिराने मिळणारी मदत व जुजबी त्रुटी काढून वारंवार प्रस्ताव नाकारण्याच्या विमा कंपनीच्या भूमिकेमुळे शासनाने या योजनेत बदल करून १७ मार्च २०२३ पासून गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा योजनेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.
अपघाती मृत्यू, अपंगत्वासाठी नवीन सानुग्रह अनुदान योजना मंजूर केली आहे. त्यात शेतकरी महिलेचा प्रसूतीदरम्यान (बाळंतपण) मृत्यू झाल्यास वारसांना २ लाख रुपयांची मदत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेतील त्रुटी काढून शेतकरी अनुकूल कार्यपध्दती अवलंबली आहे. आता प्रस्ताव मंजुरीचे अधिकार तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समितीला देण्यात आले आहेत.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या वारसदारांनी अपघातानंतर तीन दिवसांत विमा योजनेच्या लाभाचा प्रस्ताव तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे सादर करणे अनिवार्य आहे. प्रस्तावाच्या तपासणीनंतर डीबीटीने त्वरित मदत वाटपाची कार्यवाही तालुकास्तरीय समितीच करणार आहे.
शेती करताना नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांचा मृत्यू होणे अथवा अपंगत्व आलेल्या शेतकरी कुटुंबीयांना आता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत थेट डीबीटी प्रणालीद्वारे लाभ मिळणार आहे. त्यामुळे घरातील व्यक्तीच्या झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणींची परिस्थिती निर्माण होते. अशा स्थितीत शेतकरी अथवा त्याच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्यासाठी राज्य सरकार गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ही योजना राबवित आहे.
२ लाखांची मदत
अपघाताच्या दिवशी स्वतः खातेदार असलेले शेतकरी व शेतकऱ्यांच्या कुटुंबातील खातेदार म्हणून नोंद नसलेला कोणताही एक सदस्य यामध्ये आई-वडील, शेतकऱ्याचे पती-पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती असे १० ते ७५ वर्ष वयोगटातील एकूण दोन जणांचा समावेश असेल.
अपघाती मृत्यू तसेच अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव किंवा एक डोळा, एक अवयव कायमस्वरूपी निकामी झाल्यास २ लाख रुपये, तर अपघातामुळे एक डोळा अथवा एक अवयव कायमस्वरूपी निकामी झाल्यास १ लाख रुपये लाभ अनुज्ञेय आहे.
वारसदारांसाठी महत्त्वपूर्ण सूचना
अपघात घडल्यानंतर ३० दिवसाच्या आत ७/१२ उतारा, मृत्यूचा दाखला, शेतकऱ्यांचे वारस म्हणून गाव कामगार तलाठ्याकडील गाव नमुना सहा (क) नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद, शेतकऱ्यांच्या वयाच्या पडताळणीसाठी त्याचा शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र अशी वयाची खात्री होणारी कागदपत्रे, प्रथम माहिती अहवाल (एफआयआर), स्थळ पंचनामा, पोलीस पाटील माहिती अहवाल ही कागदपत्रे घेऊन संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क करून परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत.
या कारणामुळे अपघात झाल्यास मदत
शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, रस्ता रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू कीटकनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, खूप उंचावरून पडून झालेला अपघात, सर्प, विंचू दंश, नक्षलवाद्याकडून झालेल्या हत्या, जनावरांच्या हल्ल्यामुळे, चावण्यामुळे जखमी मृत्यू,
शिवाय दंगल – अन्य कोणतेही अपघात तसेच अपघाताच्या व्याख्येनुसार कोणत्याही अनपेक्षित आकस्मिक दुर्दैवी अपघातामुळे होणारे मृत्यू अथवा अपंगत्व या बाबींचा समावेश या योजनेत होतो. या यादीमध्ये आता बाळंतपणातील मृत्यूचादेखील समावेश करण्यात आला आहे.(स्रोत:पुण्यनगरी)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज