टीम मंगळवेढा टाईम्स ।
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार केल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात सोलापूर जिल्ह्यातील चार आमदारांची नावे सध्या आघाडीवर आहेत. हिवाळी अधिवेशनापूर्वी म्हणजेच नोव्हेंबरमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा-पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे, माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख व विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांची नावे आघाडीवर आहेत.
इतिहासात पहिल्यांदाच सोलापूर जिल्ह्यात भाजपचे एवढे आमदार व खासदार विजयी झाले आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष लक्ष या जिल्ह्यावर आहे.
यामध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघातून डॉ.जयसिध्देश्वर महास्वामी महाराज तर माढा लोकसभेमधून रणजितसिंह नाईक निंबाळकर हे दोन्ही खासदार भाजपचेच विजयी झालेत.
तर पंढरपूर-मंगळवेढा, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, शहर उत्तर, माळशिरस, हे पाच आमदार भाजपचे तर बार्शीचे आमदार भाजपच्या मदतीने झालेत.
आता भाजपचा डोळा प्रामुख्याने शहर मध्य, माढा, करमाळा व मोहोळ या चार मतदारसंघावर आहे. उमेदवारी वाटपात काही मतदारसंघ शिंदे गटाकडे जातील.
भाजपच्या वाट्याला येणाऱ्या मतदारसंघात भाजपचाच आमदार विजयी व्हावेत, यासाठी कोणता आमदार स्ट्राँग ठरेल त्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागेल, असेही बोलले जात आहे.
महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत मंगळवेढा-पंढरपूरात भाजपने समाधान आवताडे यांच्या रूपाने विजय मिळवला व त्यानंतर राजकीय गणिते बदलू लागली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक खूप प्रतिष्ठेची केली होती.
त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी या मतदारसंघातील नागरिकांना मोठा शब्द दिला होता. त्यामुळे आवताडे यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, माढा लोकसभा आणि करमाळा, माळशिरस या विधानसभा मतदारसंघात मोहिते-पाटलांचे प्राबल्य अधिक आहे. त्यामुळे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांना संधी मिळेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे महापालिकेवर पुन्हा एकदा भाजपचीच सत्ता यावी आणि ‘शहर मध्य’मधील काँग्रेसच्या एकमेव आमदार प्रणिती शिंदे यांचा मतदारसंघ मिळविण्यासाठी विशेषत: विजयकुमार देशमुख यांना संधी मिळू शकते.
दुसरीकडे सुभाष देशमुख यांचीही ताकद जिल्ह्यात मोठी आहे. त्यामुळे त्यांना कॅबिनेटची संधी मिळू शकते, असेही बोलले जात आहे.
पहिल्या टप्प्यात त्यांना संधी मिळेल, अशी सर्वांनाच आशा होती. पण, जिल्ह्यातील कोणालाच संधी मिळाली नसल्याने आता विस्ताराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आगामी काळात होऊ घातलेल्या महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांमध्ये भरघोस यश मिळवून पुढच्या विधानसभा, लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक आमदार व दोन्ही खासदार पुन्हा विजयी होण्यासाठी सोलापूर जिल्ह्याला विस्तारात एक कॅबिनेट व एक राज्यमंत्री मिळेल, अशी अपेक्षा जिल्हावाशीयांना आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज