टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील लेंडवे चिंचाळे येथील 16 वर्षीय मुलीचा होणारा बालविवाह पोलिस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे रोखला असून त्या मुलीच्या आई वडीलांचे पोलिसांनी समुपदेशन करून 18 वर्षे पुर्ण झाल्याशिवाय लग्न करणार नसल्याची मानसिकता तयार केल्याने तो होणारा बालविवाह टळला आहे.
लेंडवे चिंचाळे येथे दि.26 डिसेंबर रोजी एका 18 वर्षीय मुलीचा बालविवाह सांगोला तालुक्यातील हटकर मंगेवाडी येथील एका 23 वर्षीय मुलाशी होणार असल्याची गोपनीय माहिती सोलापूर येथील बालकल्याण समितीला समजली.
दरम्यान या समितीने मंगळवेढा पोलिसांना याबाबत पत्र देवून कळविले होते. पंढरपूर विभागाचे डी.वाय.एस.पी.विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे यांनी तात्काळ हालचाल करून
पोलिस नाईक हजरत पठाण, महिला पोलिस नाईक कविता आवताडे यांनी शनिवारी दुपारी लेंडवे चिंचाळे येथे जावून अल्पवयीन मुलीच्या आई वडीलांची भेट घेवून बालविवाहाचे होणारे दुष्परिणाम समजावून सांगून त्यांचे मन परिवर्तन केले.
तसेच त्यांना मुलीच्या जबाबदारीची जाणीव करून 18 वर्षे पूर्ण झाल्याशिवाय लग्न करणार नसल्याचा लेखी जबाब आई वडीलांकडून लिहून घेण्यात आला.
मुलाचे गाव सांगोला तालुक्यातील असल्याने सांगोला पोलिसांनी त्या गावी जावून त्यांना समज देवून त्यांचेही बालविवाहाबाबत मन परिवर्तन केल्याचे सांगण्यात आले. लेंडवेचिंचाळे चे पोलीस पाटील हिंमत पाटील व ग्रामसेविका तांबोळी मॅडम यांनी मोठी मदत केली आहे.
पोलिस नाईक पठाण व महिला पोलिस आवताडे यांनी त्या अल्पवयीन मुलीस सोलापूर येथील बालकल्याण समिती न्यायालय यांच्यासमोर हजर करण्यात आले.
सध्या व्हॅटस अॅप,फेसबुकचा आधुनिक जमाना असताना अजूनही आई वडील आपल्या डोक्यावरील ओझे लवकर कमी करण्याच्या हेतूने कायदयाला बगल देत बालविवाह करीत असल्याचे या घटनेवरून उघड झाले आहे.
केंद्र सरकारने नुकताच मुलीचे 18 वर्षे ऐवजी 21 वर्षे विवाह करणे यास मंत्रीमंडळात चर्चा होवून मंजूरी घेतली असताना त्याचे समाजात स्वागत होत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज